शुक्रवार, २४ जुलै, २०२०

जय जीवदानी परिवार

●  जय जीवदानी परिवार

( जीवाला जीव देणारी माणसं )


●  प्रा.आनंद आंबेकर 

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

24 जुलै 2020

----------------------------------------------------

●...आज काल नोकरी किंवा चांगले शिक्षण घेण्यासाठी लोक शहरात जाऊन राहिले आहेत . मग अश्या वेळी आपली घरची माणसं सोबत नसतात आणि सोबत असतात तेव्हा माणसाच्या मनाने...भावनेने एकत्र नसतात ...मनाची जागा व्यवहारने .. आणि भावनांची जागा भांडणानी घेतली. ….पण असं का होतं ...जो तो आपल्या समोर असणाऱ्या माणसाला दोष देतो आणि स्वतःच्या जबाबदारीच खापर दुसऱ्यावर फोडतो. आणि बोलत राहतो ...पहिल्यांदा दादा असा नव्हता ...काका एव्हढे रुक्ष पहिले नव्हते … पुतण्याला तर आपुलकीच नाही … असे डायलॉग घरोघरी ऐकायला मिळतात

मग गणपती ...शिमगा ...गोंधळ अश्या वेळी गावी एकत्र येणारी माणसं प्रेमाने वागण्यापेक्षा परक्यासारखी वागायला लागतात.

मी समाजशास्त्राचा विद्यार्थी(प्राध्यापक व्यवसाय असलातरी शिक्षण सुरूच असतं) असल्याने आणि संघटन करण्याची आवड असल्याने लांब लांब राहणाऱ्या घरच्या माणसात आपुलकी कशी आणायची यासाठी एक प्रयोग केला आहे. सद्या आपली  संयुक्त कुटुंब पद्धती नसली तरी संयुक्तिक कुटुंब पद्धती कशी करता येईल याचे प्रयत्न केले आहेत आणि गेली पाच वर्षात कधी विचारही केला नव्हता एव्हढा सक्सेस मिळाला आहे (प्रयोजन एव्हढेच आपणही असा प्रयत्न करावा) ... आणि त्यातूनच जय जीवदानी परिवार निर्माण झाला. 

जिवाभावाची ..रक्ताची नाती का भांडतात  ? 

आणि एव्हढे कोणते व्यवहार समोर येतात की स्वतःची तब्बेत काळजीत ...भीतीत नष्ट करतात. 

याचं मूळ कारण ….योग्य वेळी ...योग्य टोन मध्ये संवाद न होणे. 

आपण जेव्हा सण-समारंभात भेटतो तेव्हा त्यावेळच्या व्यवहारातच गुंतून असतो ...काय ?कसा ? आहेस यापुढे बोलणंच होत नाही. 

एकत्रित ट्रिप काढली तर ट्रिपच्या मूड मध्ये असतो.. 

खरा मनातून संवाद होतच नाही. 

… मग यांना एकत्र आणून मनापासून बोलण्याची ..व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे ... कसं आणायचं हा विचार खूप दिवस मनात होता … 

...ती वेळ आली … आणि जय जीवदानी परिवाराची मुहुर्तमेढ रोवली गेली….


●...25 मार्च 2015 च्या मध्यरात्रीची वेळ होती..

निमित्त होतं माझा लहान भाऊ महेशचा वाढदिवस .. होळी निमित्त आंबेड गावी एकत्र होतो. त्याचा वाढदिवस सरप्राईज सेलिब्रेशन  करण्यासाठी सळसळत्या उत्साहाची गंगोत्री गायत्रीने तयारी केली होती. आंबेडला गेल्यावर गप्पांचे फड लागले होते त्यामुळे ..रात्री 12 कधी वाजले समजलेच नाहीत जोरात फटाक्यांचा आवाज झाला.महेश अचिंबीत झाला आणि भारावून गेला होता.हल्ली बर्थडे सेलिब्रेशन होतात ...पण लगेच पार्टी कधी आणि कुठे देणार असा प्रश्न जोडूनच येतो ..पण रक्ताच्या नात्यात असा पार्टी देण्याचा व्यवहार नसतो… केक कापून झाला आणि अनिलदादाच्या घरी गप्पा सुरु झाल्या. सर्वच भारावलेले होते ...जो तो बोलायला लागला अस आपण एकत्र यायला पाहिजे ….खूप गप्पा झाल्या पाहीजे.. लग्न झाली नव्हती तेव्हा किती मस्त होत असं ही कुणीतरी बोलून गेलं तितक्यात प्रकाशची (चुलत भाऊ चिपळूणला वडिलांचं घर पण स्वतः पुण्यात राहतो आणि गावं आंबेड) बायको जयश्री बोलली ..असं काही नाही.. भावजयी आहोत पण मैत्रीचंच नातं आहे की.. तिच्या बोलण्यात तथ्य होतं.मुळात गावी आले की इथला व्याप कसा आवरायचा या व्यस्ततेत ...आणि कामाच्या ठिकाणी गेलो की तिथले व्यवहार सुरू होतात ...त्यात बायको मुलांमध्ये सुद्धा व्यवस्थित संवाद होत नसल्याने डोकं व्यस्त असतं . 

खुप गप्पा झाल्या ...आणि ठरलं एकत्र यायचं आणि खुप गप्पा मारायच्या.

मग माझ्या अनेक वर्षे डोक्यात जो प्लॅन होता तो सुरू झाला … सर्वांच्या डोक्यात एकच उद्देश होता तो म्हणजे रिलॅक्स होणे ...पण माझ्या डोक्यात वेगळेच उद्देश होते तो म्हणजे जुन्या काळासारखी मजबूत फॅमिली सपोर्ट सिस्टीम तयार करणे होती. 

काम खुप कठीण होतं …

ग्रुपमध्ये कोण घ्यायचं इथून सुरुवात झाली

2002 ला माझं लग्न झाल्यानंतर  

आम्ही वसईला जीवदानी देवीच्या मंदिरात फिरायला गेलो होतो ...आणि ते दोन दिवस यादगार होते ...ते सर्व लोक घ्यायचे ठरले आणि म्हणूनच जय जीवदानी परिवार असं नांव दिलं गेलं. त्यादिवशी राजेश सनी सोबत होते  मग तेही जय जीवदानी परिवारात सामील झाले.आम्ही आहोत म्हणून माझ्या दोन बहिणींचे (बेबी आणि माई )परिवार घ्यायचं ठरलं.


●...2011 ला पीएचडी रजिस्ट्रेशन झालं आणि 2012 ला वडील देवाघरी गेले 2013 ला मोठया बहिणीचे पती अचानक ऑफ झाले ...जबाबदारी घेण्याची सवय असल्याने प्रचंड ताण आला होता ..पीएचडीचं स्वप्न आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबरच अजून दोन ठिकाणची जबाबदारी आली होती ..त्यामुळे जीवदानी पॅटर्न सक्सेस करणे मुळात माझीच मोठी गरज होती. 

एकत्र येण्याला मी " चिंतन शिबीर " असं नांव दिल म्हणजे पिकनिकला जातोय हाच फील कमी करून टाकला.

मुंबई -वसई आणि रत्नागिरी-खेड-चिपळूण अश्या दोन आयोजनासाठी समित्या तयार केल्या. पहिलं शिबिर रत्नागिरी समितीने घ्यायचं ठरलं साहजिक सनी आणि माझ्यावर जबाबदारी होती.लोकांना स्वतःच्या आयुष्याबद्दल चिंतन करायला लावणे आणि तेपण घरच्या माणसांना घेऊन खुप कठीण काम होत. 

महेशसोबत बोलून दोन दिवसांच वेळापत्रक तयार करून घेतलं ...सनी सोबत हॉटेल कोहिनूर ला राहण्याची व्यवस्था केली.

जुलै 2015 चा दुसरा शनिवार आणि रविवार असं प्लॅन केलं 

शनिवारी सकाळच मुंबईतुन महेश,पूर्वा,ओम आणि गायत्री आली. पण संकटं काही कमी नव्हती मोठी बहीण माईची तब्बेत जास्तच सिरीयस होती त्यामुळे माई, प्रीती आणि आई यायचं रद्द झालं. 


●...पहिलं ओळखीचं सत्र सुरू झालं ..आणि सख्या भावाशीच पहिला मतभेद झाला तो मुंबईत MSEB मध्ये मॅनेजर पोस्टवर आहे आणि त्याच्या पिकनिक तोच अरेंज करत असतो ..तो पिकनिक स्टाईलने सत्र सुरू करत होता आणि मला एकमेकांची माहिती समजणं अपेक्षित होतं. तो नाराज झाला आणि मी फस्ट्रेशनमध्ये आलो ...मी सनीला समजून सांगितले मला काय अपेक्षित आहे ते आणि माझं म्हणणं समजून सांगण्याची  जबाबदारी त्यांनी घेतली आणि सर्वजन रिलॅक्स झाले ...महेश बोलला तुला काय करायचे आहे ते कळल्यावर काहीच प्रॉब्लेम नाही आणि इथेच चिंतन शिबिर 90% सक्सेस झालं होतं ...दोन सख्या भावांमधील मतभेद चुलत भावाने मध्यस्थी करून सुरळीत केले ...यालाच जुन्या काळातील संयुक्त कुटुंब पद्धती म्हणतात वाडीतील विषय वाडीतच मिटविण्याची "भावकी" ही सपोर्ट सिस्टीम होती ...तीच चिंतन शिबिरातून जीवदानी परिवारातून पुन्हा सुरू झाली होती. एकमेकांमधला "संवाद" वाढला..


              ( सहभोजनाचा आनंद )


●...सुनीलदादाचा मुलगा(अक्षत) डिग्री झाल्यावर नोकरी करणार होता कारण वडिलांची आर्थिक स्थिती ..पण शिबीराच्या "भविष्यातील योजना" सत्रात हे मुलाचे विचार कळल्यावर सुनीलदादाने पुढील शिक्षणासाठी तयारी दाखवली आणि अक्षत पुढील शिक्षण विशाखापट्टनमला घेत असताना जपानला जाऊन आला आणि आता अक्षत मोठ्यापगाराची नोकरी दुबईमध्ये सुरू करून आता भारतात आहे.


●...राजेशच्या राजकीय पायाभरणीसाठी सनीने आंबेडच्या ग्रामस्थांशी बोलण्यासाठी शाम आणि मला घेऊन गेला आणि केवळ 18 मतदार असूनही 20 वर्षांनंतर आंबेकरवाडीचा पहिल्यादाच ग्रामपंचायत सदस्य झाला आणि आज तो गावचा उपसरपंच आहे.राजेश ग्रॅज्युएट आहे आणि आम्ही सोबत आहोत म्हणूनच मुस्लिम मोहल्याने स्वतःची 100 एक मत असून सुद्धा आपला उमेदवार उभा नकरता ग्रामपंचायत निवडणूक नहोता उमेदवार बिनविरोध निवडून आले.जीवदानी संवादामुळे गावची शान वाढली.


●...गौरी,पूर्वा,दीप्ती (तिघी नर्स)यांच्या मेडिकल अवेरन्स लेक्चरमुळे अनेकजण आरोग्य संदर्भात अंतर्मुख झाले आहेत… 

..गणेशचा योग ...जिज्ञासाच्या झुंब्बा ट्रेनिंगने शिबिराची रंगत येते आहे ..साक्षी, आर्या,सौरभ मदत करतात.

माझ्या इन्व्हेस्टमेंट (पैसा आणि माणसं) याचा मेळ घालणाऱ्या चर्चासत्राची अजूनही सर्वजण फॉलो करतात म्हणून सांगितात तेव्हा समाधान होते.


               ( संवादातून आरोग्याकडे )

●...लता,बेबी,संध्या,अनिता,(या बहिणी) 

गायत्री वहिनी ,गौरी, पूर्वा,सानिका,पूजा(या जावा)

दिपू ,प्रीती, (या भाच्या)

साक्षी,जिज्ञासा,सिद्धी,(या पुतण्या) आर्या मुलगी या सर्व महिलांचे मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले ही सर्वात मोठी गोष्ट होती.


●...पेवेकर भाऊनंतर माईचा (मोठी बहीण)मृत्यू झाल्यानंतर प्रितीचं लग्न करताना संपूर्ण जीवदानी परिवार यजमान झाला होता आज दोन्ही भाच्याचे नवरे  शिबीर संवादातून मित्रा सारखे राहतात   देवळेकरभाऊ,दिनेशदादा,अनिलदादा,सुनीलदादा यांचे प्रशांत-निलेश या नवीन जावयांशी आपुलकीचे संबंध झाल्याने दिपू प्रीतीचे मी आणि महेश पालक म्हणून त्यादोघी सासरी कश्या असतील असा येणारा ताण कमी झाला.

( संवादातुन चिंतनाकडे )


●...कधी कधी निर्माण झालेल्या जिव्हाळ्यामुळे मजेशीर गोष्टी होतात..एकमेकांची मने जपण्यासाठी स्वत:च्या आवडी-निवडी बाजूला ठेऊन समोरच्या मन राखण्यासाठी आवडी-निवडी स्वीकारतो ….

अशीच एक मजेशीर घटना ….

कार घ्यायची होती ..पहिली कार फारच काम काढायला लागली होती त्यातील दर्दी म्हणून सनीला बोललो ...सनी म्हणाला दादा माझी ड्रीम कार आहे मारुती सुझुकी ची सियाज ती घेऊया ...पण मला  तर SVU मध्ये घ्यायची होती आपल्याकडील रोड आणि डस्टर रुबाबदार दिसते म्हणून मनात भरली होती ...सनी म्हणाला डस्टर म्हणजे दादा तो मला तर ट्रॅक्टर वाटतो ….सियास एकदम भारी आहे ...कारची मला अजिबात क्रेज नाही ...एक गरज म्हणून वापरायची म्हणून कोल्हापूरचा मित्र नंदू याला पीएचडी काम सुरू असताना बोललो होतो एखादी जुनी डस्टर बघ ...नंदूचा मित्र माने तो गाड्यांमध्ये दर्दी मॉडीफाय करून वापरण्यामध्ये एक्सपर्ट ….पण हा कोल्हापूरचा असाच पेंडिंग होता.

तो पर्यंत सनीने जोर धरून स्वतः च्या आवडीची सियास घ्यायला लावली आणि एक महिन्यानंतर नंदूच्या मित्राने डस्टरला मॉडिफाय केलेले फोटो पाठवले सनीला म्हणालो बघ काय नशीब ...आता डस्टर आली ...सनीची नवीन कार पेट्रोल असल्याने आणि त्याचा बांधकाम व्यवसाय असल्याने त्याची कार बदलायची होती ...मग मी जोर धरला सनी ही डस्टर घे मला खूप आवडली आहे ….आणि तो तयार झाला.. सनीचा फायनान्शियल प्रॉब्लेम माने आणि त्याने  सोडून आज माझ्या आवडीची डस्टर सनीने घेतली आणि त्यांच्या आवडीची सियाज मी घेतली. 

संवाद साधला की आपल्या आवडी निवडीही ऍडजेस्ट करतो हेच यातुन दिसते

पण संवाद नसेल तर गरज असूनही आपण ऍडजेस्ट करत नाही… 

नोव्हेंबर 2015 च्या वसई येथे दुसऱ्या जीवदानीचे शिबिर सूरु असतांना एक चुलत भाऊ फायनांनशील प्रॉब्लेम असल्याने व्यथित असतांना दिसला…"भविष्यातील योजना" या आमच्या चर्चेत आर्थिक पाठिंबा विषयक चर्चा सुरू झाली आणि देवळकर भाऊ RDC बँकेत मॅनेजर असल्याने बचत गट तयार करण्यासाठी सल्ला दिला आणि बघता बघता आज " जीवदानी बचतगट "  आमच्या परिवाराचे आधाराने ठिकाण झाले आहे.  गणेश त्याचा चोख हीशोब ठेवतो आज एख्यादया कुटुंबाला 1 लाख तातडीने मिळू शकतात अशी व्यवस्था तयार झाली आहे. 

( बचतगटाचा लेखा-जोखा )


विषेश म्हणजे गेल्या पाच वर्षात एकही आर्थिक व्यवहारातून ताण तयार झाला नाही ...कारण आम्ही ते व्यवहार बॅंकेच्या नियमात करतो ...तिथे अजिबात भावनिक विषय आणत नाही ...म्हणूनच सुरुवातीला ज्यांच्या आर्थिक अडचणी दिसत होत्या  ते बचतगटाचे मेम्बरच झाले नाही आणि आम्ही आग्रह केला नाही 

म्हणूनच आज जय जीवदानी ...जीवाला जीव देणारा परिवार तयार झाला आहे.

अजून खुप मोठी स्वप्न बघायला आता जीवदानी परिवाराचा सदस्य अजिबात घाबरत नाही ….कारण आहे जीवदानी तर का घाबरायचे. 

अशी आहे ...नवीन जमान्यातील नवीन कुटुंब व्यवस्था .

..मग तुम्हीही प्रयत्न करा आम्ही नक्की मार्गदर्शन करू.

|| जय जीवदानी ||

सोमवार, ६ जुलै, २०२०

वाय फा (Y'faa)...कलाकारांचे संघटन

वाय फा (Y'faa) ..कलाकारांचे संघटन 
----------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
6 जुलै 2020
----------------------------------------
कालच गुरू पौर्णिमा झाली.
दोन दिवस अगोदर लोकमत मधून अतिशय अभ्यासू पत्रकाराचा फोन आला. तुम्ही प्राध्यापक म्हणून खुप कमी वर्षात तुमच्या विद्यार्थ्यांचा आदर मिळवला आहे. तुमच्याबद्दल 'गुरू' म्हणून भावना व्यक्त करण्यासाठी  तुमच्या विद्यार्थ्यांचे नंबर द्या.लोकमत गुरूपौर्णिमा निमित्त एक स्वतंत्र पेज तयार करत आहे . थोडा विचार केला आणि फोन नंबर दिले... पहिला विद्यार्थी होता... श्रीकांत (रत्नागिरीत वकील म्हणून विश्वासाचं नांव कमावलं आहे )...
माझ्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी.. मी 1999 ला दिवाळी सुट्टीनंतर गोगटे कॉलेजमध्ये जॉईन झालो.. त्यापूर्वी "आठल्ये सप्रे कॉलेज" देवरुख येथे होतो. FYBA च्या वर्गात श्रीकांत होता ...पण खरी ओळख सांस्कृतिक मध्ये झाली ..योगेश चव्हाण ..संतोष सुतार आणि इतर मंडळी थिएटर करायचे...श्रीकांत अतिशय स्पष्टव्यक्ता असल्याने लगेजच जुळलं.. त्यामुळे SYला असताना त्याला सांस्कृतिकचा CR केला. त्यावेळी कॉलेजमध्ये डेज व्हायचे.. पण ते युथफेस्टिव्हल साठी काहीच उपयोगी नव्हते. मग मी स्किट स्पर्धा घ्यायचं ठरवलं तर प्रायोजक म्हणून श्रीकांतनी स्वतः तयारी दर्शवली ...आणि 'भाटवडेकर चषक' सुरू झाला ...सांस्कृतिक मंडळाची सुरुवात झाली ..आणि आजही माजी विद्यार्थी संघटना  मध्ये कार्यरत आहे. 
दुसरं नांव होत ते योगेश कुंभारचं (झी टीव्ही मराठी मध्ये कार्यकारी निर्माता )ज्याला मी.. तो 12 वी ला असताना 'शामराव करंडक' एकांकिका स्पर्धेत परीक्षक असताना पाहिलं होतं....जबरदस्त काम करण्याची आग होती म्हणूनच कॉलेजसाठी अनेक किर्तीमान निर्माण केले ...महाराष्ट्राचा गोल्डन बॉय झाला ...कोंकणात प्रथमच थिएटर ट्रॉफी मिळून देण्यात त्याचं विद्यार्थी नेतृत्व होतं ...म्हणूनच तो 'झी' च्या बॅनर मध्ये मोठ्या पडद्यावर काम करत आहे.

 सायली सुर्वे (इंटरनॅशनल स्कुलची जनसंपर्क अधिकारी म्हणून मुंबईत काम करते ) घरची अतिशय बेताची परिस्थिती ...पण टॅलेंट जबरदस्त ...पण इतरांना जुळवून घेताना कठीण यायचं ... पण ती सांस्कृतिक टीम मध्ये काम करण्याचा अनुभव घेतल्याने आज ती जनसंपर्क अधिकारी होऊन टीम सांभाळायच करीयर करत आहे हे बघून आनंद होतो.
विदीशा म्हसकर (यशस्वी tv अभिनेत्री) SYBsc च्या वर्गात FC च्या क्लास मध्ये आळस देऊन बसलेली विदिशा अजून आठवते ..भिऊ(आसामी लोकनृत्य) डान्स साठी परफेक्ट मुलगी होती म्हणून क्लास झाल्यावर भेटायला बोलावलं ...आणि कलाकार म्हणून प्रवास सुरु झाला. 
शैलेश इंगळे(डबिंग आर्टिस्ट आणि साउंड रेकॉर्डिस्ट) भेटला तेव्हा अतिशय बुजरा मुलगा म्हणून भेटला ...त्याच्या मित्राने चुगली केली.. सर हा .....सरांची जबरदस्त नक्कल करतो ..घाबरतच करून दाखवली ... आणि त्याचा प्रवास सुरु झाला. 
या सर्वांवर स्वतंत्र ब्लॉग लिहायचा  आहे म्हणून थोडक्यात लिहीत आहे.
गुरूपौर्णिमेला विद्यार्थ्यांच्या भावना वाचून आनंद झाला ...
पण का कुणास ठाऊक मनात एक अस्वस्थता होती .
मी ज्या विद्यार्थ्यांचे नंबर दिले ते एक सक्सेस विद्यार्थी होते. ...त्यांनी माझ्या सहकार्याबद्दल खूप आदरपूर्वक विचार मांडले ...पण गेली 21 वर्ष माझे अनेक विद्यार्थी क्लोज झाले ते केवळ कलाकार म्हणून झाले ...परंतु काही मोजक्या विद्यार्थ्यांच्या सक्सेसवर मी समाधान मानने  योग्य आहे का ? ..असा प्रश्न भेडसावत होता ..आणि महत्वाचे.. त्यांचा सक्सेस केवळ माझ्यामुळेच नाही तर ...त्यांची गुणवत्ता ...त्यांची मेहनत ...त्यांच्या सपोर्ट सिस्टीम वर  आहे. 
आणि ते विद्यार्थी आपल्याला का आदर देतात तर आपण सपोर्ट दिला म्हणून ...पण तो सपोर्ट आपण किती वर्षे देतो तर 3 ते 5 वर्ष . पण खरी लढाई नंतरच होते .
यामुळेच पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी आवडतील अश्या भावना व्यक्त केल्यातरी... अस्वस्थ आहे. 
आज कलाकार म्हणून व्यवसाय अनेक आहेत पण सपोर्ट सिस्टीम नसल्याने अनिश्चितता आहे. ही अनिश्चितता कमी करण्यासाठी आपण एक संघटन उभं केलं पाहिजे असं सतत वाटत होतं. 
अनेकांशी गेली 5 ते 6 वर्ष याबद्दल बोलत आहे त्यांना ही कल्पना आवडली...कायम प्रोत्साहन दिले... 'तुम्ही करा आम्ही या चळवळीत सोबत आहोत'. परंतु सुरूवातच होत नव्हती. काल म्हणजे गुरुपौर्णिमेलाच आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी ....कलाकारांसाठी एक अनोखे संघटन सुरू करावे म्हणून Y'faa नांवाने फेसबुक पेज तयार केले आणि बघता बघता 90 मेम्बर झाले. 
Y'faa (वाय फा) म्हणजे Youth Festival Artists Association 
हे संघटन सर्वच कलाकारांना प्रोत्साहन ...प्रेरणा.. सहकार्य  देणार आहे..... युथ फेस्टिव्हल कलाकार संघटन करण्याची मुख्य दोन कारणे.. एक म्हणजे मोठ्या स्पर्धेत कसून तयारी करण्याचा अनुभव गाठीशी असणार आहे आणि दुसरं म्हणजे या कलाकारांशी वेगळंच भावनिक नातं आहे. 3 ते 5 वर्ष 'कलाकार' म्हणून युथ फेस्टिव्हल मध्ये काम केल्यानंतर सर्वांनाच 'कलाकार' म्हणून करियर करता येत नाही.. परंतु  त्यांच्या अंतर्मनात असलेल्या कलाकाराला पुन्हा प्रोत्साहित करण्यासाठी Y'faa नक्की आपले योगदान देईल. त्यामुळे अगदी शालेय विद्यार्थी ते रिटायर्ड व्यक्ती कलाकार म्हणून जगत असेल तर या Y'faa च्या क्वालिटी मार्गदर्शनाचा  ...दर्दी लोकांचा सहवास वाढेल... अजून काही शिकता येईल ... याच अपेक्षेने हे नवीन संघटन सुरू करत आहे. 
तर मग चला आयुष्यभर कलाकार म्हणून एकत्र राहू.....

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला   डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी दिनांक - ३० डिसेंबर २०२३ ___________________...