" परिचारिका "
कोविड योद्धाला पुस्तकरूपी सलाम
डॉ.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी
दिनांक : 6 जानेवारी 2021
----------------------------------------------------------------
" रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांची भूमिका "
या पीएच.डी.संशोधन अध्ययनाचे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी दोन शब्द पुस्तक निर्मिती बद्दल ...कोविड योद्धाची भूमिका सर्वांसमोर आणण्यासाठी असंख्य लोकांनी सहकार्य केले आहे त्याच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक दोन शब्द ... तर पुस्तक प्रकाशनाला आवर्जून मान्यवर उपस्थित होते त्याच्या प्रतिक्रिया सदर ब्लाँगमध्ये व्यक्त करणार आहे.कोविडकाळात प्रकर्षाने परिचारिकांची भूमिका समजून आली म्हणून हा प्रपंच ...
मनोगत
माझ्या पहिल्या पुस्तकाचे मनोगत लिहिताना एक लेखक म्हणून खूप आनंद होत आहे." रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांची भूमिका" या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला 2006 मध्ये ज्यावेळीं गडिंहीग्लज मध्ये डॉ.प्रभाकर द्राक्षे सर यांच्याकडे मी पहिल्यांदा एक संशोधक विद्यार्थी म्हणून गेलो आणि एम फिल साठी काय अभ्यासक्रम घेऊ शकतो अशी सुरुवात झाली. सुरुवातीला माझ्या डोक्यामध्ये एखाद्या कम्युनिटीचा स्टडी करायचा विचार चालू होता परंतु द्राक्षे सरांनी गप्पा मारायला सुरुवात केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की माझ्या कुटुंबांमध्ये परिचारिका महिला खुप आहेत. सरांनी सुद्धा एक परिचरिकेवर एक अत्यंत आत्मीयतेने अभ्यास करून लेख लिहिला होता. त्यामुळे परिचारिका विषय घ्यावा असे वाटू लागले.पीएचडी च्या मार्गदर्शिका डॉ.उषा पाटील यांनी सुद्धा " परीतक्त्या " यावर संशोधन अध्ययनाचे पुस्तक लिहिले होते. त्यांनी मला ते पुस्तक वाचायला दिलं आणि त्या क्षणी वाटलं की आपल्या पीएचडी चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर आपण सुद्धा " परिचारिका " या विषयावर पुस्तक लिहायचं.
या पुस्तकाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भावनिक पातळीवर जास्त विचार केलेला आहे. तसं पाहिलं तर वरवर आपल्याला व्यावसायिक भूमिकांचा अभ्यास आहे असा दिसेल परंतु परिचारिकांच्या भावनिक कोषाचा येथे भरपूर विचार केलेला आहे आणि त्यामध्ये असलेले तात्विक मुद्दे पूर्णपणे तत्वज्ञानावर आधारित आहेत हे मुद्दे सर्वांना पुस्तक वाचताना आदर्श रूप वाटतील. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण हे संपूर्ण समाजातील सगळ्या वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शक होईल अशा पद्धतीने त्याची मांडणी केली आहे. प्रकरण-2 मध्ये शारीरिक स्वच्छता आणि शारीरिक तपासणी याचा अत्यंत आदर्श रूप लिखाण केलेले आहे म्हणजेच केवळ परिचारिकांच्या भूमिकांचा अभ्यास न करता आपल्या प्रत्येक घरांमध्ये आपल्याला उपयोगी पडेल अशी शारीरिक जोपासण्यासाठी इथे प्रकरण तयार केलेला आहे.
परिचारिका यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये भारतीय कालखंडामध्ये समाजसेवी गरजेतून व्यावसायिक सुरुवात कशी झाली याची मांडणी केली आहे तसेच पाश्चिमात्य देशात युध्द काळामध्ये गरज म्हणून सुरू झालेली परिचर्या व्यवस्था आधुनिकतेकडे कश्याप्रकारे वळली याचे विवेचन केले आहे यामध्ये फ्लॉरेन्स नाईनडेंगेल च्या कर्तृत्ववाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो.
पुस्तक लिहिण्यासाठी सात आरोग्यखात्यातील पुस्तक लेखकांच्या पुस्तकांचा आढावा घेण्यात आला आहे तर भारतातील तेरा विविध विद्यापिठामध्ये संशोधन झालेल्या अध्ययनाचा गोषवारा मांडण्यात आला आहे त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील विचारमंथनाचा आनंद घेता येणार आहे.
अध्ययन करण्यापुर्वी सतत निरीक्षक करत असताना आजूबाजूला अनेक परिचारिकांच्या जीवनातील घटना निरीक्षल्या गेल्या त्यातून खरी लिखाणाची उमेद निर्माण झाली अनेक घटना तर अंगावर काटा आणणाऱ्या आहेत नियमित बघण्यातील परिचारिका किती सामान्यपणे आपलं जीवन जगताना दिसतात पण थोडं त्याच्या आयुष्यात डोकावल्या नंतर किती असामान्य काम करतात याची प्रचिती आली. त्यामुळे संशोधन लिखाणात ललीत लिखाणाचा आनंद घेता येणार आहे.
सहकारी परिचारिकांशी सहकार्य घेताना देताना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ऑर्डर घेताना त्याचबरोबर कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी व्यवहार करताना परिचारिकेचा संघर्ष होताना दिसतो तोच संघर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुद्धा होत असतो आपल्यालाही अशा अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात अशा वेळेला परिचारिकांच्या भूमिका टॉपिक तुम्हाला वाचताना आपल्या भूमिकांची नक्की जाणीव होईल आणि स्वतःच्या आयुष्यासाठी सुद्धा हे वाचन उपयोगी पडेल असे मला आवर्जून सांगायचे आहे
हे केवळ पीएचडीच्या चिकित्सक अभ्यासाचे पुस्तक नाही तर प्रत्येक व्यक्तीला अनेक भूमिका पार पाडताना जो संघर्ष करावा लागतो त्या संघर्षाचे निराकरण कसे करावे यासाठी हे " रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांची भूमिका " हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकते.
--------------------------------
पुस्तक खरेदी करण्यासाठी विशेष सवलती
मूळ मूल्य : 220 /
कोविड काळात वाचकांसाठी मूल्य : 200/-
परिचारिकांसाठी विशेष मूल्य : 180/-
संपर्कासाठी नंबर : 9422372009
--------------------------------
ऋनानुबंध
"रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांची भूमिका"
हे पुस्तक लिहिण्यासाठी मला अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी सहकार्य केले आहे परंतु सर्वप्रथम ज्यांचे ऋण मी मानू इच्छितो त्या आहेत 100 शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि 50 खाजगी रुग्णालयातील परिचारिका ज्यांनी आपला अमूल्य वेळ आणि वेळा बरोबर अत्यंत मनापासून संवाद साधला त्यामुळेच या विषयासंदर्भात आपुलकी निर्माण झाली. माझी पत्नी गौरी आणि दोन मुलं आर्या आणि श्रवण यांचा मनापासून ऋणी आहे , कारण कौटुंबिक अपेक्क्षांची तडजोड करून पुस्तक लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याचबरोबर माझी आई बहीण स्वाती देवळेकर तिचे पती सुधीर देवळेकर आणि भाऊ महेश त्याची पत्नी पूर्वा त्यांच्या भावनिक पाठिंब्यामुळेच मी पुढची वाटचाल करू शकलो.
कोल्हापूर मध्ये काम करण्यासाठी येणार म्हटलं की माझा अत्यंत जवळचा मित्र अमर हिलगे आणि कुटुंबातील सर्वच सदस्य आपुलकीने वागतात म्हणून येणारा तणाव कमी व्हायचा अमर तर मी कोल्हापूरला येणार म्हटलं की शिवाजी पुलावर वाट बघत बसतो आणि आम्ही संपूर्ण काम होईपर्यंत त्माझ्यासोबत राहतो त्या सहवासाची किंमत करता येणार नाही.
खरं पाहिलं तर एक टायपिंग करणारा माणूस मित्र कधी होऊन जातो कळलंच नाही. मैत्रीपूर्ण सल्ले देणे किंवा मैत्रीपूर्ण भावनिक आधार देणे हे श्रीकांत देसाईला ( नंदू ) अत्यंत खुबीने जमते म्हणूनच त्याचे प्रोत्साहन पुढच्या कामासाठी मला उपयोगी पडत असते.
रत्नागिरीतील वैयक्तिक मित्रांपैकी बिपिन शिवलकर आणि बिपिन बंदरकर या दोघांचा अतिशय खंबीर पाठिंबा असतो आणि मला अत्यंत गरजेचा असतो.त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे कामाला सतत उमेद येते.
वैचारिक पातळीवर मला सतत पाठिंबा देणारे माझे प्राध्यापक मित्र डॉ.राजेंद्र मोरे, उदय बामणे या दोघांच्या सतत विचारपूर्वक संभाषणातून माझ्या कामाला सतत प्रोत्साहन मिळत असते ते इतर कॉलेजमध्ये प्राध्यापक असले तरी माझें समवयस्क असल्याने सतत त्यांचा वैचारिक पाठिंबा असतो. प्राध्यापक शुभम पांचाळ आणि भक्ती दळवी यांनी अतिशय आशयपूर्ण मुखपृष्ठ तयार केले आहे शुभम हा खरं म्हणजे माझा विद्यार्थी.. नंतर झाला माझा सहकारी प्राध्यापक आणि आज तो क्रिएटिव्ह काम करण्यासाठी सतत सहकार्य करणारा सोबती झाला आहे.
पुस्तकाची तयारी करण्यासाठी माझ्या मार्गदर्शिका डॉ.उषा पाटील या सतत मला प्रोत्साहित करत राहिल्या आणि उत्तम पुस्तक होण्यासाठी अजून काय करता येईल याचा सतत पाठपुरावा घेतला .
महाविद्यालयातील सहकार्यांमध्ये समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे,प्रा.शिवजी उकरंडे आणि सहकारी सचिन सनगरे यांचीही सतत प्रोत्साहन असते. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर सुखटणकर हे केवळ महाविद्यालयाचे प्रशासक नराहता माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी आदर्श काम कसे करू शकतो याचे सतत मार्गदर्शन करत असतात, सहकारी मित्र बापू गवाणकर , प्रभारी प्राचार्य डॉ.पी.पी.कुलकर्णी, डॉ.मकरंद साखळकर, यांचेही सतत प्रोत्साहन असते.
आरोग्य विभागातील कै. डॉ. दिलीप मोरे आज ते असते तर खूप खुष झाले असते मला सतत आपुलकीच्या ..वडीलधारीच्या हक्काने सतत मला मार्गदर्शन करत असायचे त्याचबरोबर डॉ. शिवदिप किर यांच्याशी मैत्रीपूर्ण संभाषणातून मोलाचे मार्गदर्शन मिळत गेले ते स्वतः मेडिकल कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत अल्याने त्यामुळे या पुस्तकासाठी त्यांच्या संभाषणाचा अत्यंत उपयोग झाला आहे.दूरदर्शन सह्याद्रीचे माजी निर्माता श्री जयु भाटकर यांचे सतत आदर्श काम करण्यासाठी मार्गदर्शन असते.
रत्नागिरीतील पत्रकार अरुण आडिवरेकर, राजेश कळंबटे, जान्हवी पाटील,समीर शिगवण,अनघा निकम , शोभना कांबळे, मेहरूनिसा नाकडे, आणि रत्नागिरी खबरदारचे संपादक आणि जिवलग मित्र हेमंत वणजु यांचे पुस्तक निर्मितीसाठी सतत पाठिंबा आहे
शेवटी मी असा उल्लेख करीन की, हे पुस्तक संपूर्ण परिचारिकांच्या आयुष्यात केवळ मार्गदर्शक न होता शासन पातळीवर ती त्याची नोंद घेण्यासाठी मला माझे राजकीय मित्र आदरणीय शिक्षणमंत्री उदयजी सामंत यांचे मार्गदर्शन असते त्यांच्या पाठिंब्याची कायम हमी असते.
.
--------------------------------
मान्यवरांचे आशीर्वाद
" रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांच्या भूमिका " डॉ.आनंद आंबेकर यांच्या पीएच.डी. संशोधनावर पुस्तक निर्मिती करण्यात आली , या पुस्तकाच्या सोहळ्यासाठी आरोग्य क्षेत्रातील मान्यवर , मित्र परिवार अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 2011 पासून गेली नऊ वर्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे डॉ. उषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आनंद आंबेकर यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 100 शासकीय आणि 50 खाजगी रुग्णालयातील परिचारिकांची मुलाखत घेऊन अध्ययन केले. संपुर्ण भारतातील सोळा विद्यापीठातील परिचारिका अभ्यासकांच्या पीएच.डी. अध्ययनाचा गोषवारा घेऊन सदर अध्ययन करताना " भूमिका संघर्ष " या प्रमुख संकल्पनेवर सदर अध्ययन केले.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार श्री. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुस्तकाची पहिली प्रत देऊन त्यांच्या घेतल्या आणि पुढील परिचारिका वेलफेअर साठी सहकार्याची ग्वाही दिली.सदर भेटीसाठी रत्नागिरी खबरदार चे संपादक श्री.हेमंत वणजू यांनी विशेष सहकार्य केले.सोबत मित्र राजा साळवी आणि मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समनव्यक श्री निलेश सावे , रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री प्रदीप तथा बंड्या साळवी उपस्थित होते
डॉ.आनंद आंबेकर यांनी प्रास्ताविक करताना आवर्जून सांगितले की तीन वर्षे फिल्ड वर्क करताना अनेक अनुभव सर्वासोबत सांगितले त्यावेळी अतिशय कठीण प्रसंग आलेले सांगितले. डॉ.अलिमियाँ परकार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आवर्जून सांगितले की, डॉ.आनंद आंबेकर यांच्या अध्ययनामुळे समाजाभिमुख शिक्षणाला चालना मिळेल तसेच परिचारिका या माझ्या वैद्यकीय क्षेत्राच्या कणा आहेत असे आवर्जून सांगितले.
रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी कोविड काळात परिचारिका समाजाच्या किती महत्वाचा घटक आहेत हे जगासमोर आले आहे, आणि डॉ.आनंद आंबेकर यांच्या अध्ययनामुळे परिचारिकाच्या आयुष्याला शास्त्रीय दृष्टीने पाहता येईल.
माजी आमदार आणि यश फौंडेशन नर्सिंग कॉलेज अँड मेडिकल रिसर्चचे संस्थापक बाळासाहेब माने यांच्या रत्नागिरीतील पहिल्या नर्सिंग कॉलेजच्या चॅलेंजीग गोष्टी कथित केल्या आणि डॉ.आनंद आंबेकर यांच्या सोबत असलेल्या वैयक्तिक संबंधाबद्दल आवर्जून उल्लेख केला.
संगमेश्वरी रक्तामुळे जास्तीतजास्त सामाजिक भान आहे की काय असे मिश्किल व्यक्तव्य करत नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री.,अभिजित हेगशेट्ये यांनी डॉ.आनंद आंबेकर विद्यार्थीदशेपासून अनेक सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असल्याचे आवर्जून उल्लेख केला.
आत्मनिर्भर होण्यासाठी महिलेने संघटित होण्याची आणि समाजातील सर्वच क्षेत्रात पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे यासाठी परिचारकाचा प्रत्यक्ष फिल्ड मधील डॉ.आनंद आंबेकर यांचे अध्ययन परिचारिका आत्मनिर्भर होण्यासाठी नक्की उपयोगी पडेल असे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी आवर्जून सांगितले .
डॉ.आनंद आंबेकर गोगटे महाविद्यालयाच्या सर्वच आघाडीवर अग्रेसर असतात त्यांच्या ऊर्जेचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होतो असे जाणीवपूर्वक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.पी.कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे यांनी असे सांगितले की,विद्यापीठातील 800 कॉलेजचे समन्वयक म्हणून काम करताना डॉ.आनंद आंबेकर यांचे वेगळेपण कायम दिसत असते, आम्ही दोघे स्वतःच्या कॉलेज दशेपासून युवा महोत्सव मध्ये सक्रिय होती तिथं पासून त्यांची प्रामाणिक धडपड दिसून येते.
बिपीन बंदरकर,जयु भाटकर,डॉ.निधी पटवर्धन, रवींद्र केतकर, हेमंत पाडगावकर,बाळा पावसकर विशेष उपस्थित होते.
पुस्तकाच्या सुबक मुखपृष्ठ तयार केल्याबद्दल प्रा. शुभम पांचाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला डॉ.आनंद आंबेकर यांचा महाराजा परिवार आणि 95 परिवार आवर्जून उपस्थित होता, अनेक आजी माजी विद्यार्थी आयोजकांच्या भूमिकेत असलेले दिसत होते, तसेच प्राध्यापक समूहाचा मनस्वी परिवार उपस्थित होता तसेच अनेक मित्र आणि आई चंद्रभागा, पत्नी गौरीं आणि परिवारातील सभासदांबरोबर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील विणा लेले आणि मुग्धा सोहनी या आजी माजी मेट्रन आणि परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष स्नेहा बने आवर्जून उपस्थित होत्या. साक्षी कॅटर्स च्या साक्षी आंबेकर आणि स्वप्नील केळशिकर, साई मंगल कार्यालयाचे मंदार दळवी यांनी उत्तम सहकार्य केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्रा.आरती पोटफोडे यांनी केले कार्यक्रमाच्या अखेरीस डॉ.आनंद आंबेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.