मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

युथ फेस्टिवल.. भारावलेली 30 वर्षे

  युथ फेस्टिवल... भारावलेली 30 वर्षे 
      आज प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर भेटले आणि फ्लॅश बॅक सुरू झाला ......युथ फेस्टिवल साठी 1993 मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी तर्फे ग्रूप इव्हेंट मध्ये काहीतरी करायचं ठरले… पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा एकत्रित गोगटे जोगळेकर महाविद्यालय मध्ये स्पर्धा झाली.  त्यामध्ये आमच्या कॉलेजतर्फे समूहगीत गायन.. एकांकिका या दोन इव्हेंट साठी सहभाग घेतला.  दोन्ही इव्हेंटमध्ये सिलेक्शन झालं नाही.  पण मुकअभिनय एक वेगळाच नाट्या मधील कलाप्रकार आम्ही बसवत होतो संकल्पना आणि दिग्दर्शन प्रा.विजयकुमार रानडे करत होते. वैभव मांगले, सोनाली बापट ,बिपिन शिवलकर असे आम्ही ठराविक कलाकार एकत्र येऊन तंदूर कांड वरती मूक अभिनय इव्हेंट बसवत होतो.  महाविद्यालयातून प्रथमच हा कलाप्रकार करत असल्याने तो कसा सादर करतात तेही आम्हाला माहीत नव्हते. मुंबईचे सर्व संघ स्किन टाइट ब्लॅक किंवा व्हाईट कपडे घालून सज्ज होते. आमच्याकडे ते कपडेच नव्हते त्यांनी तोंडाला पांढरा रंग लावला म्हणून आम्ही लावला. अशी सर्व गंमत होती विद्यार्थी दशेतील होती.आम्ही विदयार्थी असताना परीक्षक म्हणून विजय पाटकर होते.आमचे अतिशय सुमार सादरीकरण झाले होते .विजय पाटकर त्यांच्या बोलण्यात या ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळायला हवे हीच कळ कळ दिसतं होती. आम्ही खुप खजील झालो. 

     1999 मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी या स्वतःच्याच कॉलेजला प्राध्यापक म्हणून हजर झाल्यानंतर  2003 आणि 2004 मध्ये मुकभिनयचे लिखाण आणि दिग्दर्शन करून  कास्य पदक पटकावले. या आनंदापेक्षा….आज 2023 मध्ये तीस वर्षानंतर पुन्हा  विजय पाटकर एकांकिकेची परीक्षक म्हणून भेटले .. आज मी विद्यापीठाचा मॅनेजमेंट कमिटी सदस्य म्हणून त्यांच्याशी सहज गप्पा मारता येत होत्या.त्यांना  30 वर्षापूर्वीचा किस्सा सांगितला . .. आणि ते अवाक झाले. पण तीच तळमळ आजही विजय पाटकर यांच्यामध्ये युथ फेस्टिवलसाठी  दिसत होती .दोन एकांकिकेच्या मधल्या वेळात खूप हळव्या मनाने नवीन मुलांना चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे ..चांगले थेटर मिळायला पाहिजे असे आवर्जून सांगत होते.निलेश सावे आल्यानंतर त्यांनी हे आपले विचार पुन्हा त्याच्याशी काकुळतीने मांडले सावे सरांनी ग्रामीण भागातल्या मुलांचा लक्षणीय सहभाग आवर्जून सांगितला ..या दोघांच्या संभाषणात मी तर फक्त शांतपणे अंतर्मनामध्ये गेल्या 30 वर्षाचा हिशोब करत होतो .काय ते दिवस होते ..काय ती ऊर्जा होती आपण स्वतः स्टेज वरती न जाता सुद्धा तीच ऊर्जा तीच हुरहूर कशी काय जिवंत राहू शकते…असा आश्चर्यचकित होऊन स्वतःकडेच बघत होतो ..पण विजय पाटकर सारख्या अत्यंत यशस्वी कलाकाराला सुद्धा युथ फेस्टिवल भारावून टाकून परीक्षक म्हणून अखंड दोन दिवस दहा दहा तास तरुणांमध्ये बसण्याची कोण ऊर्जा देते ?  शेवटी कलेसंदर्भात असलेली प्रामाणिक इच्छा हीच सर्वांना एकत्र आणते.


      विनोद जगताप मोठ्या आजाराने त्रस्त असून सुद्धा स्वतःचे निष्ठावंत असिस्टंट असून सुद्धा मेकअप रूममध्ये आवर्जून उपस्थित असतो हे पण तीस वर्ष सतत भेटणारी लोक ज्याने मला सुद्धा मूक अभिनय मध्ये तोंडाला रंग लावला होता.ही विनोदला कोण उर्जा देते .. रंगदेवता नक्की सामर्थ्य पुरवते अशीच प्रचिती येते. संजय तोडणकर सारखा असाच एक हरहुन्नरी कलाकार लाईट संदर्भात अतिशय शांतपणे मार्गदर्शन करणारा आजही 30 वर्षानंतर तितक्याच नम्रपणे नवीन विद्यार्थांना समजून घेणारा संजय दादा कुठली ऊर्जा घेऊन येतो असा प्रश्न पडतो. 


      विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सहभागी झाल्याबद्दल निलेश सावेने 25 वर्षे पूर्ण केली परंतु विद्यार्थी दशेपासून त्यांनी सुद्धा तीस वर्ष विरार सारख्या भागातून येऊन मुंबई वरती राज्य करतोय ही ऊर्जा कुठून येते साहजिकच प्रामाणिक कलेवरतील प्रेमापोटी येते. फार मोठे आर्थिक हिशोब नकरता केवळ कले संदर्भात भावनिक प्रेमापोटी ही सर्व मंडळी काम करताना दिसतात .. कधी कधी प्राध्यापक डोकावतो .. सांगतो किती वर्ष युथ करणार आहेस ..पण पुन्हा कलाकार प्रभावी होऊन .. विजय पाटकर .. निलेश सावे .. विनोद जगताप .. संजय तोडणकर सारख्या लोकांच्या संगती मध्ये त्यांच्या निस्सीम कलेवरील प्रेमामध्ये प्राध्यापक हरतो आणि कलाकार जिंकतो…

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला   डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी दिनांक - ३० डिसेंबर २०२३ ___________________...