रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

अभ्यास पी एच डी चा ...परीक्षा आयुष्याची

अभ्यास पी एच डी चा...परीक्षा आयुष्याची


प्रा.डॉ.आनंद आंबेकर

समाजशास्त्र विभाग

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

8 ऑक्टोबर 2020

–-------------------------------


महाविद्यालयात काम करत असताना पी एच डी करणे म्हणजे मोठी कसरत असते म्हणूनच अनेक प्राध्यापक अभ्यास रजा घेतात आणि आपल्या संशोधन विषयावर पूर्ण लक्ष देऊन संशोधन पूर्ण करतात  ...परंतु माझ्या बाबतीत असं काही घडलं नाही. उलट अध्यापन कामा बरोबरच सर्वात व्यस्त असणाऱ्या सांस्कृतिक विभागांची ही जबाबदारी सर्व सहकाऱ्यांच्या सहाय्याने काम करत होतो. स्पर्धात्मक काम असल्याने खुप प्रेशर घेऊन आणि देऊन काम करून घ्यावे लागत होते. म्हणूनच या नऊ वर्षात दोन वेळा महाविद्यालयाचे नॅक असेसमेंट झाले आणि A ग्रेड मिळाली त्यामध्ये आमच्या सांस्कृतिक विभागाची जबाबदारी मोठी असायची .

महाविद्यालयाच्या जबाबदारी असायचीच ...पण या नऊ वर्षात कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा अनाहूत पणे पडत राहिल्या …

2009 ला M.phil पूर्ण झाल्यानंतर 2010 ला Phd च्या रजिस्ट्रेशनचा प्रयत्न केला ...मुलाखत होती त्याच्या आदल्यादिवशी गौरीची (पत्नी)आई  आजारी पडली अचानक मालवणला जावं लागलं… त्यांची तब्बेत स्थिर झाल्यावर मिसेसनेच धीर देऊन मला पी एच डी च्या मुलाखती साठी पाठवलं ...गगनबावडा घाटातून माझी दमछाक झाली होती ...प्रचंड उलट्या होत होत्या…हॉस्पिटलमधून आल्याने माझ्याकडे कपडे सुद्धा व्यवस्थित नव्हते ...अमर (कोल्हापूरचा मित्र ) सोबत होताच ...कपड्याच्या शोरूम मधून कपडे घातले आणि इंटरव्ह्यू ला गेलो ...पण हॉस्पिटलमधल्या वातावरणाचा मनावर परिणाम असल्याने मुलाखत चांगली झाली नव्हती ...सहाजिकच माझे सिलेक्शन झाले नाही.

परंतु मिसेसने दिलेला धीर आयुष्यभर विसरू शकत नाही … श्रवण एक वर्षाचा होता ….त्यात तिची आई आजारी होती तरीही मला पाठींबा देत होती.

शेवटी….

2011 ला रजिस्ट्रेशन झालं …"परिचारिका"  या  विषयाची निवड होई पर्यंत 2012 उजाडलं 

 2012 ला...3 मे 2020 रोजी लग्नाच्या दहाव्या ( 5 मे)वाढदिवसाच्या तयारीसाठी  नातेवाईकांना फोन सुरू होते..अचानक आंबेड मधून फोन आला अण्णांना कसतरी होतंय म्हणून ..मी आणि गौरी आंबेडला गेलो ...सिव्हिल मध्ये समजलं वडिलांना ब्रेन हॅमरेंज झाला आहे ...लगेच मुंबईत जसलोकमध्ये घेऊन जायचं ठरवलं  ..दिपू ( भाची) जसलोकमध्ये असल्याने सोपं होतं पण जाताना बिपीन शिवलकर.. अभिजीत मांजरेकर.. देवळेकर फॅमिली ..सुनीलदादा मदतीला होते ... हॉस्पिटलमध्ये 4 महिने उपचार केले पण यश आले नाही अण्णा गेल्याने आंबेड गावातील सर्व जबाबदाऱ्या येऊन पडल्या त्यातच गावातील घराचे नूतनीकरण केले 21 भावाना एकत्र करून काम करायचे म्हणजे मोठी कसरत होती. महेश आणि विजयदादा, रामचंद्रअण्णा, प्रवीणदादा मदतीला असल्याने शक्य झालं..पण पीएचडी चा विषय नक्की झाल्याचे समाधान होते.

2013 मध्ये मोठ्या बहिणचे पती यांचे अपघाती आणि गूढ रित्या मृत्यु झाला आणि ..पोलीसस्टेशन ...कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या ...परत बहीण आणि भाची यांना सावरणे अतिमहत्त्वाचे होते .. महत्वाचे म्हणजे भाऊच्या अर्धवट स्वप्नाची म्हणजे घराची पूर्णत्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडली होती .. बापू गवाणकर, संतोष सावंत आणि राजेश घाग यांनी खुप मदत केली म्हणूनच घर अधिकृत झाले होते.. आई एकटी झाली होती तिकडे दुर्लक्ष होऊन जमणार नव्हते पण आईने स्वतःला खूप खुबीने सावरलं होतं अण्णांसोबत जवळजवळ 55 वर्ष संसार केल्यानंतर एकट्याने राहणं कठीण होते पण आई ती आईच 

तर मुलगा (श्रवण) तीन वर्षांचा असल्याने ती वेगळी तारांबळ होती … इकडे मुलांच्या आईची तारांबळ सुरू होती गौरी सतत सोबत होती ..त्यामध्ये पी एच डी च्या अभ्यासासाठी फिल्डवर्क सुरु झालं होतं.

2014 ला अचानक आमचा आधारस्तंभ असलेला प्रकाशभाऊ कॅन्सरच्या आजाराने आम्हाला सोडून गेला ...त्याच्या तीन मुलांपैकी एकाची जबाबदारी आवर्जून घेतली आणि त्याला हॉटेल मॅनेजमेंट साठी रत्नागिरी मध्ये बोलावले … माईला पण सोबत होणार होती...कधीही गावी नराहिलेला पुतण्या अभिषेक स्वतः ध्येयवादी असल्याने गावी आला होता.अभिषेक आज शिक्षण पूर्ण करून 5 स्टार हॉटेलमध्ये काम करत आहे ...स्वतः पायावर उभा आहे याचे नक्की समाधान आहे.

 2015 ला रत्नागिरीतील घराचे रिनुव्हेशन चे काम सुरू करणे गरजेचे झाले होते … 2010 ला जून असलेलं घर विकत घेतल असल्याने त्यात काही बदल अपरिहार्य होते ...काम सुरू झालं आणि नवीन नवीन कल्पना सुचायला लागल्या आणि काम वाढत गेलं…अजुनही पीएचडीचे फिल्ड वर्क 150 परिचारिकांच्या मुलाखती घेऊन झाल्या होत्या असंख्य लोकांनी सहकार्य केले होते… गौरीच्या ओळखीचा खूप उपयोग व्हायचा … पण खाजगी रुग्णालयात मुलाखत घेणे कसरत असायची ...काही ठिकाणाहून तर मला अजिबात सहकार्य मिळायचं नाही थोडक्यात हाकलून दिलं जायचं ..पण अश्या कठीण प्रसंगी परिचारिका विषयाबद्दल अजून आपुलकी तयार झाली.आणि इतर विद्यापीठं आणि राज्यातील पीएचडी केलेल्या लोकांचा अभ्यास सुरू झाला होता.

याच वर्षी 1 एप्रिल 2015 रोजी 95 मित्रांचा व्हाट्सएप ग्रुप तयार केला ...अर्धवट राहिलेलं मित्राचं संघटन सुरू केले आणि अचानक बिपीन बंदरकर सारखा दिलदार मित्र जवळचा मित्र कधी झाला कळलंच नाही त्याच्या तुफान एनर्जीने आयुष्यात सकारत्मकता आली असे नम्र पणे कबूल करावे लागेल.

2016 मध्ये अचानक मोठी बहीण आम्हाला सोडून गेली आणि दुःखाचा डोंगर कोसळला ..ज्याबहिणीमुळे माझं कॉलेजच शिक्षण झालं त्या बहिणीच्या जाण्याने भावनिक पोकळी तयार झाली होती ...आणि भाचीच्या पालकत्वाची जबाबदारी आली होती ...भाचीच्या लग्नाची जबाबदारी मोठी होती ..पण राहतं घर भाडोत्री राहण्यासाठी काही बदल करायचे होते तेव्हा सनी आणि महेशच्या mseb च्या मित्रांनी मदत केली होती. पीएचडी च्या विश्लेषणाची वेळ आली होती ..विद्यापीठात विशेष फेऱ्या सुरू झाल्या होत्या प्रचंड पित्त असल्याने वडाप व्हॅन मधूनच प्रवास सुरु असायचा यावेळी माजी विद्यार्थी शिवा मोहिते आणि त्याचे काका व्हॅनमध्ये माझी पुढची सीट बुक करून ठेवायचे त्याचे मोठे सहकार्य असायचे म्हणूनच दिवसभर नंतर अभ्यास होऊ शकायचा… नंदू देसाईच्या (टाइपिंग करणारा कोल्हापूरचा मित्र) धिरामुळे हलकं वाटायचं.. घरातून जाताना प्रेशर असायचं पण नंदू एकदम रिलॅक्स करून पाठवायचा ...नंदू नेहमी म्हणायचा सर तुम्ही मना पासून अभ्यास करत आहात म्हणून तुम्हाला प्रेशर येत आहे ...काम आपलं एक नंबर होणार.. काम बेस्टच करायचं होतं ...सतत मुलाखत देणाऱ्या परिचारिका डोळ्यासमोर यायच्या मग अजून चांगलं काम करायला प्रेरणा मिळायची..मला मार्गदर्शन करणाऱ्या डॉ उषा पाटील मॅडम कधीच नाउमेद करत नव्हत्या ...पण चांगलं काम करण्यासाठी आग्रह होता.

2017  चार  महत्वाच्या गोष्टी घडल्या होत्या एक  म्हणजे प्रीतीचे (भाची) लग्न ठरले ...मोठी जबाबदारी मोकळी होणार होती ..पण पत्रिका वाटतानाच नवीन सियाज गाडीचा मोठा अपघात झाला आणि मृत्यूला हॅलो केल्याचा अनुभव होता ...पुन्हा एकदा सर्व मित्र सोबत होते.. दुर्दैवाने ब्रेन ट्युमर झालेला अतिशय जिवलग मित्र हरिष राणे आम्हाला सोडून गेला होता ...आणि आयुष्यभराची पोकळी ठेऊन गेला ...परत कधी त्याच्या लॉजवर रहायच धाडस झालंच नाही ..हरिष म्हणजे जीव की प्राण मित्र होता त्याचा सहवास म्हणजे हवाहवासा वाटायचा ...सतत त्याची काळजी वाटायची ब्रेन ट्युमर झाल्याचं 15 महिन्यापूर्वी कळलं होतं … अण्णा (हरिष चे वडील) आणि शिरीष नेहमी मरताना पहात होते .. तो जाण्यापुर्वी 3 दिवस अगोदर अमरचा फोन आला … हरिष तुझी आठवण काढत होता ...तुझ्याकडे रत्नागिरीला आनंदला भेटायला जायचं म्हणतोय असे शिरीषने (हरिषचा लहान भाऊ)सांगितले...अमर आणि मी फोन वर रडायला लागलो होतो ...गौरीला घटना सांगितली ...लगेच दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो …

हरिषला भेटलो त्याचा ट्युमरला सूज आली होती त्याच्याकडे बघवत नव्हतं ...कसाबसा रत्नागिरीत आलो आणि तिसऱ्या दिवशीच हरिष आम्हाला निघून गेला...अजून कोड उलगडत नाही की, हरिषचा खुप मोठा मित्र परिवार होता ...पण त्याच माझ्याशी असलेलं नातं काही वेगळच ...आजही हरिषची आठवण आली की, डोळ्यात पाणी येत ...

..पण सप्टेंबर 2017 मध्ये पिएचडी चा थेसिस जमा केला.

 2018 मध्ये पीएचडी चे काम पूर्ण झाले म्हणून थोडा रिलॅक्स झालो पण 8 ते 9 महिन्यानंतर असं समजलं की माझ्या तपासणीसाठी गेलेला थेसिस चुकीच्या व्यक्तीकडे गेला होता ..मराठी मधील माहिती असणाऱ्या एक्सपर्ट साठी पुन्हा विद्यापीठ  मंजुरी घेणे गरजेचे होते ...पुन्हा नवीन प्रतीक्षा सुरू झाली 

2019 मध्ये पीएचडी थेसिस च्या तपासणीसाठी संपूर्ण वर्ष प्रतीक्षा करावी लागली ... नागपूरची बहीन रुबी तायडे च्या ओळखीमुळे डॉ.शिनगारे यांच्या सहकार्याने रिपोर्ट मिळण्यासाठी खुप मोठी मदत झाली .कॉलेजच्या कामाच्या जबाबदारीमुळे पूर्ण वेळ व्यस्त गेला ..आणि सांस्कृतिक विभागाची विस्कळीत झालेली घडी नीट करण्यात वेळ गेला ...पण कॉलेजला A ग्रेड मिळाल्याचा आनंद होता.. प्राचार्य डॉ.किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन नक्की मिळत होते विशेष म्हणजे मला पी एच डी चा अभ्यास करण्यासाठी आवटे मॅडमकडे सांस्कृतिकची जबाबदारी दिली होती त्यामुळे तो वेळ माझ्यासाठी मोलाचा होता त्यामुळे त्यांचे आभार...विद्यापीठ स्तरावर थिएटर चॅम्पियन टॉप 3 मध्ये आलो आणि वैष्णवी जोशी मॉरिशसला जाण्यासाठी यशस्वी झाली अश्या कॉलेजच्या 3 मोठ्या गोष्टी घडल्या.

2020  फेब्रुवारी मध्ये पीएचडी चे सर्व रिपोर्ट आले ...व्हायव्हा होणार तर लॉक डाऊन झालं ...पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी प्रतीक्षा करावी लागणार होती ...पण याच काळात आरोग्य विभागाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं ...माझा संशोधनाचा विषय परिचारिका असल्याने ...नक्कीच लोकांचे लक्ष त्या विषयावर केंद्रित झालेले आहे ...अखेर 19 ऑक्टोबर 2020 ही दिनांक व्हायव्हा साठी जाहीर झाली.

मी 18 ऑक्टोबर म्हणजे आदल्या दिवशीच गेलो सोबत पत्नी गौरी आणि भाऊ सनी होते...प्रेशइंटेशन ची तीन प्रकारात तयारी केली होती … नऊ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा दिवस उजाडला होता..

टाइपिंगचे थोडे काम होते म्हणून सकाळी नंदूकडे गेलो तर नंदूच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले होते ...त्याने शिल्लक काम कसेबसे कॉपी करून दिले

बाजारात प्रिंट मारायला एक भटकंती करावी लागली ..लाईट नव्हती ...मग एक भला माणूस भेटला आणि प्रिंट मारून दिल्या ...बरोबर एक वाजता कर्नाटक मधून आलेले डॉ जवळीकर हॉल मध्ये आले आणि लाईट गेला ….थोड्या वेळाने लाईट आला आणि लॅपटॉप सुरू होईना … गौरी च्या चेहऱ्यावरचे रंग उडाला होता ...का कुणास ठाऊक मी स्थिर होतो 

अखेर लॅपटॉप सुरू झाला … प्रेसिडेंटेंशन मनासारखे झाले …. सर्वानीच कौतुक केले ...काही सुचना दिल्या … आणि अखेर समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जगन कराडे सरानी ...आम्ही आपल्याला डॉक्टरेट पदवी जाहीर करतो अशी उद्घघोषना केली ...आणि गौरी आणि सनीचा चेहरा खुलला … 


मार्गदर्शक मॅडम डॉ. उषा पाटील मॅडम खूष होत्या ...मित्र अमर , शिरीष गुरू डॉ.डी श्रीकांत सर्वांच्या समाधानाचा चेहरा बघून आनंद झाला 

...आणि मला सुद्धा एक तपश्चर्या पूर्ण झाल्याचे समाधान होते.


पी एच डी पूर्ण झाल्यावर महाराजा परिवार, 95 फॅमिली, साई सेवा मंडळ,नाचणे, रोहिदास सेवा मंडळ रत्नागिरी, सांस्कृतिक मंडळ, राईचा परवात ग्रुप, अखिल भारतिय नाट्य परिषद ,रत्नागिरी शाखा जय भैरी मंडळ, मांडवी, सह्याद्री दूरदर्शन चे निर्माता जयु भाटकर, पद्मा भाटकर आणि फॅमिली यांच्या सत्कारामुळे आनंदात न्हाऊन निघालो …

राजेश कळंबटे मुळे ABP माझा च्या मुलाखत(अमोल मोरे उमेश सावंत), रत्नागिरी खबरदार चा विशेषांक(हेमंत वजजु), तरुण भारत (जान्हवी पाटील)ची मुलाखत यामुळे आपण समाज उपयोगी संशोधन केल्याचा आनंद झाला.

पण ...असंख्य लोकांचे सहकार्य विसरता येत नाही 

ज्यावेळी संशोधनाचे पुस्तक होऊन शासन दरबारी विचार होईल तेव्हा संशोधन केल्याचा जास्त आनंद होईल.

७ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

सर आपल्याला पी.एचडी सर्वोच्च पदवी प्राप्त झाली.
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!! 💐💐💐

यशश्री पावसकर

Samidha sawant म्हणाले...

Mast sir😊

Umesh Ganesh Chiplunkar म्हणाले...

मामा तुझा phd चा 9 वर्षाचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे तुझी जिद्द चिकाटी खूप दांडगी आहे तू न डगमगता येणाऱ्या संकटांवर मात देत तुझा प्रवास चालू ठेवल्यास मामी ने पण तुला मोलाची साथ दिली तसेच परिवार आणि मित्र परिवार यांनी पण तुला वेळोवेळी साथ दिली व तुझे ध्येय साध्य करण्यासाठी तुला प्रोत्साहन दिले. अखेर तुझे मेहनतीचे फळ तुला मिळाले तुझे मनःपूर्वक अभिनंदन आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👌👌👍👍💐💐

प्रिया नेवरेकर म्हणाले...

मामा तुझा पी.एच. डी. प्रवास मी जवळुन पाहिला आणि अनुभवाला आहे. तुझ्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्यातील एक म्हणजे कोणत्याही प्रसंगात न डगमगता खंबीरपणे उभे राहणे. डॉक्टरेट मिळण्यापर्यंत तू ज्या सर्व जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्यास याच श्रेय जितक तुला आहे तितकंच ते मामी ला ही आहे.तुला डॉक्टरेट मिळालेली पाहून खूपच आनंद झाला आपण ही काहीतरी केलं पाहिजे असे वाटू लागले. आज अभिमानाने सांगू शकते की माझा मामा डॉक्टर आहे. तुला असेच यश आणि मामी ची साथ मिळात राहो ही सदिच्छा

My Life (Dr.Anand Ambekar) म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
My Life (Dr.Anand Ambekar) म्हणाले...

महेश आंबेकर
मॅनेजर
MSEB, बांद्रा , मुंबई
तुझा भाऊ

*प्रवास*... एक *स्वप्नपूर्तीचा*....

अनेक थोर विचारवंतांनी सांगितलं आहे की आयुष्यात मोठी स्वप्न बघा... आणि ती ध्येय बनवून पुर्णत्वास न्या...
आणि हेच विचार उराशी बाळगून... समोर अशक्य वाटणारे ध्येय ठेऊन... नियोजन पद्धतीने... कष्टाने.... चिकाटीने तु तुझं *स्वप्न* पुर्ण केलेस आनंद..
याचा खुप आनंद आणि अभिमान तर वाटतोच.. पण प्रेरणा ही मिळते.
आनंद चा.. प्राध्यापक आनंद आणि आता डॉ. आनंद...
हा प्रवास तुझ्या साठी सोपा नव्हता... केवळ जिद्द, चिकाटी, सातत्य, प्रामाणिक पणे केलेले प्रयत्नामुळे तु शक्य केलेस.. डॉक्टरेट तु मिळवणे हे यासाठी *विशेष* आहे... की दहावीत गाडी घसरलेला मुलगा पुढे काय करणार.. तर कोणी चौथ्यांदा प्रयत्न न करता सरळ ड्रायव्हिंग, एखाद्या दुकानात सेल्समन, एखाद्या शहरात कंपनीत कामाला नाहीतर राजकारण्यांचे मागे पुढे राहुन आपलं आयुष्य रेटणार.. आणि त्यात काही चुकीचं आहे असेही नाही... शेवटी उदरनिर्वाह हा आहेच... अगदी तुझा प्रवासही तसाच सुरु झाला होता... प्रथम संगमेश्वर ला A1टेलर आणि नंतर रत्नागिरीत नीलम टेलर यांच्याकडे शिकाऊ नंतर कारागीर झालास... पण तिथेही आपल्या कौशल्य छाप सोडलीस आणि आता हेच करिअर नक्की होणार असे सर्वांना वाटले.. पण आतुन तु स्वस्थ नव्हतास...रत्नागिरीत माई भाऊजींकडे राहुन दहावी पार केलीस.. नंतर बारावी पहिल्या फटक्यात... ते ही चांगले मार्क्स मिळवून... पुढे graduate फर्स्ट क्लास मिळवून.... पण हे काय सहज घडत नव्हतं... तासनतास थिबा पॅलेस मध्ये अभ्यास करताना मी अनेकदा पाहिलेय... आणि संध्याकाळी पॉकेट मनी साठी STD मध्ये काम करताना ही एखादं पुस्तकं तुझ्यासोबत असायचेच.. B. A. पुर्ण झाले म्हणजे तुझ्यासाठी खुपच अशीच भावना आमची सर्वांची होती.. त्यामुळे टायपिंग करून ऑफिस मध्ये क्लार्क च्या नोकरीसाठी प्रयत्न करावे, हीच अपेक्षा असताना तुझ्या मनात वेगळेच होते.. तिथेच तु मात्र lecturer होण्याचं स्वप्न बघत होतास... सर्वांसाठी हा मूर्खपणा वाटत होता. अण्णांचा विरोध डावलून आईला हाताशी धरून पुढे PG साठी कोल्हापूर गाठलेस... आणि तिथेही यशस्वी पणे अभ्यास पुर्ण करून चक्क प्राध्यापक झालास.... आणि सर्वांचा अंदाज खोटा ठरवलास.... पण आपण खोटं ठरल्याचा मात्र अण्णांना आणि आम्हांला विलक्षण आणि अभूतपूर्व आनंद वाटत होता... पण इथे ही तुझं स्वप्न पुर्ण झालं नव्हतं... पुढे M. Phil करत पुढे तुला डॉक्टर व्हायचंच होत... आणि आता हे अशक्य वाटणार पण मनोमन तुला विश्वास असणार स्वप्न पुर्ण केलेस.... हा प्रवास सोपा नव्हताच.. जिद्द, चिकाटी, ध्येय ठेऊन प्रामाणिक पणे पर्यंत केले तर आयुष्यात काहीही शक्य आहे, हे तु आपली सर्वसामान्य बुद्धिमत्ता आहे असे वाटणाऱ्या सर्वांसाठी उत्तम उदाहरण म्हणून दाखवले आहेस......
या थक्क करणाऱ्या तुझ्या प्रवासाला मनापासून सलाम 🙏
अजुन पुढील नियोजित सर्व स्वप्न पुर्ण होवोत, यासाठी भरघोष शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन 💐💐
तुझा भाऊ...
महेश
22/10/2020

My Life (Dr.Anand Ambekar) म्हणाले...

स्वाती देवळेकर
ट्रेझरी ऑफिसर
खेड, रत्नागिरी
तुझी बहीण

जिद्दीची झेप
सर्वसामान्य पणे लोक आरशात स्वतः चे रूप पाहतात पण आनंद आरशात स्वतःची प्रगती पाहत होता.दहावीच्या परीक्षेच्या वेळी कांजिण्या आल्या होत्या अगदी डोळ्यात सुद्धा. त्यामुळे नापास झाला. पण हताश न होता जिद्दीने पुन्हा प्रयत्न करून पास झाला.तू अशी गरुड भरारी घेतली की प्रत्येक वर्षी first class. बीए एमए एम फील.करून गप्प राहिला नाहीस.
तुला पुढील झेप घ्यायची होती त्यासाठी खूप चिकाटीने अभ्यास केला आणि डॉक्टरेट पदवी संपादन केली.
तू हे करताना अनेक मुलांना खूप छान घडवलेस. तुझा आदर्श आजच्या मुलांनी खरंच घेतला पाहिजे.
तितक्याच जोमाने तू कला क्षेत्रात ठसा उमटवला आहेस.अनेक कुटुंब एकत्र येण्यासाठी तू जीवदानी परिवार हा ग्रुप तयार केला. त्यामुळे तरुण पिढीतील मुलांना नात्यांचे महत्त्व कळले. वेगवेगळ्या स्वभावाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र आणून एकजुटीने राहण्यासाठी तूझी धडपड असते.अनेक उपक्रम केलेस.
सलाम तुझ्या जिद्दीला.
तू डॉक्टर आनंद झालास त्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान वाटतो. तुझे मनापासून अभिनंदन
तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला   डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी दिनांक - ३० डिसेंबर २०२३ ___________________...