सोमवार, २९ जून, २०२०

अनिलदादा आहे ना...... ( एक विश्वासाची नातं)

अनिलदादा आहे ना...
( एक विश्वासाच नातं )
--------------------------------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
30 जून 2020
---------------------------------------------------------------
 प्रत्येकाच्या आयुष्यात अशी विश्वासाची नाती असतात ..पण तीचं अस्तित्व आपल्या आयुष्यात सामावलेलं असतं ...
तुम्हीही शोधा मग म्हणाल "------" आहे ना ...
या विश्वासाच्या नात्यावरच आपलं आयुष्य.. आनंद घेत असत ...दुःख शेअर करत...स्वप्न पहात असतं 
ही विश्वासाची नाती विरळ होतात तेव्हा ...
सुशांतसिंग राजपूत सारखं घडत ....
आयुष्यात वरवर सर्व काही असल्यासारखं वाटतं आणि अंतर्मनात खुप एकटे असतो.
म्हणून हा ब्लॉग लिहिण्याचा प्रपंच करत आहे.
प्रत्येकाने आपल्या विश्वासाच्या व्यक्ती बद्दल 
"----------" आहे ना ....असं अनुभवलं पाहिजे.
ही नाती असंख्य होत नाहीत ..एखादच असतं
हे विश्वासाचं नातं घरात पाहिजे...
मित्रांमध्ये पाहिजे ...
जिथे राहतो तिथे पाहिजे ....
काम करतो तिथे पाहिजे...
पण हा विश्वास अचानक नाही तयार होत ...त्यालाही इन्व्हेस्टमेंट करावी लागते.
इन्व्हेस्टमेंट असते भावनांची ...नात्यातील तरलतेची 
माझ्या घरात अश्या विश्वासाची हक्काने सामावलेली व्यक्ती म्हणजे अनिलदादा
दादाची रिटायरमेंट..
असा मेसज आला आणि सर्रकन दादाचा संपूर्ण प्रवास आठवू लागला.
मी 10 एक वर्षाचा असेन .... 80 चे दशक 
सकाळी 7 वाजता लगबगीनं पूण्याच्या गाडीवर पोस्टाची बॅग घ्यायला जाणारा दादा नेहमी आठवतो. अण्णा (माझे वडील.शिक्षक होते) धाकामुळे रत्नभूमी पेपरच पार्सल घेण्यासाठी मी ही त्याच गाडीवर डोळे चोळत उठायचो. उठायला उशीर झाला की, पाट चोळायची (अण्णांचा धपाटा खाऊन)वेळ यायची ..पण पेपरच पार्सल नक्की असायचं कारण अनिलदादा आहे ना...    एव्हढा विश्वास अनिल दादा वर असायचा. हा विश्वास पोस्ट खात्यालाही असायचा.त्याकाळी संपर्काचे एकमेव माध्यम म्हणजे पोस्ट.एस टी गाडीवरच आवक जावक असायची ...ती चुकली की ...झाला बट्ट्याबोळ... अख्खी मुंबई कोकणची आणि कोकणची आर्थिक मदार मनिऑर्डरवर यांचा दुवा म्हणजे पोस्ट खातं. 
अनिलदादा विश्वासाने आणि अदबीने काम करायचा.
अचानक पितळेची तबकडी लावलेला खाकी कपडे घातलेला दादा दिसला. कारण दादा आता एस टी मध्ये कंडक्टर झाला होता.तो चांगल्या नोकरीला लागल्याच्या आनंदापेक्षा गावातील लोकांना काळजीच जास्त होती ..ती म्हणजे सकाळच उठून एवढी वक्तशीर पोस्टाची बॅग कोण घेणार . दादाने एवढा विश्वास तयार केला होता. दादाने सायकल घेतली . मयु (माझा लहान भाऊ) आणि मी  दोघे दादाच्या पाठीमागे शेपटा सारखे कायम  असायचो. मी जरा जास्तच आगाऊ असल्याने पाय पुरत नसताना सायकलच्यामध्ये पाय घालून चालवायचा प्रयत्न करायचो .. आणि एकदा धाडकन खाली कोसळलो .. आई  जवळ आली मला वाटलं मायेन जवळ घेईल ..पण कसलं ...जो रट्टा पडला आणि म्हणाली मेल्या अनिलदादा आहे ना... घे शिकून. अख्या वाडीत विश्वासाच दुसरं नांव म्हणजे अनिलदादा....
वाडीत कोणताही कार्यक्रम असो आणि वाडीचा अध्यक्ष कोणीपण पण असो पण १००% काम करायला अनिलदादा ...
हा विश्वास केवळ वाडीतच नव्हे ....तर एस टी विभागात पण कमावला... चिपळूण डेपोनंतर थोड्याच दिवसात गुहागर डेपोला बदली झाली ती रिटायर्ड होईपर्यंत ... 
मी गोगटे कॉलेजमध्ये 11 वीला ऍडमिशन घेतलं.... मस्त ग्रुप झाला पण अनिलदादा आंबेडला असला तरी त्याचे शूज ..शर्ट कॉलेजला घालून मुरडायचो. 
12 वीलाअसताना तर मोठी गंम्मत झाली .....
 ट्रिपला आयोजन केलं तीन दिवस गोव्यात चांगले कपडे घालायचे म्हणून अनिलदादाच्या कपड्याचा धुरळा केला. मी रत्नागिरीत माईकडे(माझी सर्वात मोठी बहीण) पोलीसलाईनीत रहायचो. ट्रिपवरून आल्यावर दादा कपडे घेऊन जायला आला , ड्युटी संपली होती म्हूणून गोवा ट्रिपचा शर्ट घालून निघाला .. चर्च रोड कडून जाताना ट्रिपला असलेल्या माझ्या मैत्रिणींनी पाठीमागून दादाला पाहिलं त्यांना वाटलं मीच आहे त्यांनी आंबेकर म्हणून हाक मारली ,मुली हाक मारतायत म्हटल्यावर दादा घाबरला ..... भलताच लाजाळू ... तो कधी वहिनीसोबतसुद्धा सर्वांच्या समोर बोलताना दिसला नाही ...म्हणजे दादाची काय अवस्था झाली असेल....
 त्याने जोरात चालायला सुरुवात केली आणि निघून गेला (हा प्रसंग आठवला की अजून हसायला येतं) किती शांत असावं म्हणजे आयुष्यात स्थैर्य येऊ शकत ..म्हणजे अनिलदादा आठवतो ...मी जेव्हा प्राध्यापक म्हूणून गोगटे कॉलेजमध्ये हजर झालो आणि पहिला पगार घेतला तेव्हा देवाजवळ पेढे, आई अण्णांना कपडे आणि दादाला निळ्याकलरचा बारीक चेक्सचा शर्ट घेतला होता. आई अण्णाच्या कपड्याचे रंग आठवत नाही पण दादा तसा नात्याने चुलतभाऊ असलातरी .त्याच  गणितच वेगळं आहे .दादा फारच कमी बोलतो पण त्याच्या विश्वासपूर्ण वागण्यातून भावनिक गुंतवणूक होते 
पोहायला जायचं असेल तर दादा हवा...
शिमग्याची भारे चोरायचे असतील तर दादा हवा .... 
पूजेला / गोंधळात दादा नसेल तर जमतच नाही ...
क्रिकेट खेळायला दादा नसेल तर साली मज्जाच येत नाही..... 
त्याच्या या वागण्यामुळे तो रिटायर्ड होतोय असं वाटतच नाही. 
अनिलदादा सारखा दादा आयुष्यात असणं म्हणजे केव्हढी देवाची देणगी असल्यासारखं वाटतं ... 
...पण हेच साक्षीला वाटतं आनंद अंकल आहे ना...
साक्षी दादाची एकुलती एक मुलगी आणि आमची लाडकी पूतणी ... ती 22 वर्षाची आहे पुण्यात 5 स्टार हॉटेलमध्ये काम करते . पण ती आमच्यासाठी अजूनही लहान वाटते... ती दादाच्या लग्नानंतर आठ वर्षांनी झाली...त्यामुळे खूपच लाडकी 
मी गावी सण-समारंभात नक्की असतो ...साक्षीची सातवीची परीक्षा झाल्यावर मे महिन्यात आमच्या घरी वहिनी मागच्या दरवाजाने ( तो आमच्या साठी मुख्य दरवाजाच वाटतो ...कारण अख्ख गांव तिथेच आईशी गप्पा मारायला येतं)  लगबगीनं आली...आणि म्हणाली भाऊ साक्षीला रत्नागिरीत शिकायला यायचं आहे आणि हे मान्य करत नाही आहेत.
...मी म्हटलं थांब आलो ... दोघांचं ऐकूण घेतलं आणि मग दादाला म्हणालो ...फाटक शाळेत साक्षीची मामी शिक्षिका आहे कशाला घाबरतोस ...शहरात मुलं स्मार्ट होतात . 
दादाला फार समजावं लागलं नाही ... पण तसा निर्णय घेणे अवघड होतं आमच्या आंबेकरांमध्ये सर्वात मोठी शेती आणि गोतावळा असणार घर दादाचं ..आणि असं घर सोडून रत्नागिरीत येणं मुश्किल होतं. 
...पण दादा आता वेगळ्या मोड मध्ये होता..  आनंद म्हणतोयना .... 
साक्षीची 10 वी झाली ..मी दादा-वहिनीला आणि साक्षीला म्हणालो. माझं मोठं घर आहे तुम्ही माझ्या इथेच रहायला या... साक्षी माझ्याच कॉलेजमध्ये जाईल. 
तिघे रहायला आले आणि माझ्या दोन मुलांनाही घरची माणसं मिळाली ...श्रवण (नर्सरीत असताना)तर संपूर्ण फॅमिली म्हणून शाळेत सर्वांची नांवे सांगायचा ..त्याचं पण असचं झालं अनिल काका आहे ना...त्यांनीच आर्या- श्रवणला सायकल शिकवली ...साक्षिला ऍक्टिव्हा शिकवायला मी मदत केली या छोट्या छोट्या गोष्टींच एकमेकांमध्ये विश्वासाच नातं तयार करतात. 
बारावी नंतर काय करणार तर माझ्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं ठरलं तितक्यात  
मुंबईच्या पुतण्याला (अभिषेक  ..त्याचे वडील म्हणजे माझा चुलत भाऊ कॅन्सरने मृत्यू झाल्याने त्याच्या शिक्षणाची जबाबदारी आली) रत्नागिरीत हॉटेल मॅनेजमेंटसाठी बोलवलं. मी साक्षीला म्हटलं 'प्लेन सायन्स करून काही उपयोग नाही .... तू पण हॉटेल मॅनेजमेंट कर' ... ती दुसऱ्या मिनिटाला तयार झाली दादाच तर म्हणणं होतं ..आनंद अंकल सांगतील तसं कर . कारण साक्षीच्या 10 नंतर कॉलेजमध्ये पालक म्हणून माझंच नांव असायचं ..म्हणूनच गेली वर्षभर साक्षी पुण्यात उत्तम 5 स्टार हॉटेलमध्ये काम करत आहे. दादाच्या रिटायर्डमेंटच्या अगोदरच मुलगी कामाला लागली.. हिच दादासाठी सुखावह गोष्ट होती.
 ...माझ्यासाठी अनिलदादा आहे ना...
तर साक्षीसाठी आनंद अंकल आहेत ना.. हे आहे.
हीच नात्यातील विश्वासार्थाच आयुष्य सुलभ बनवते
अनिलंदादाच्या पुढील आयुष्यात सतत आम्ही सोबत असणारच आहोत ... तुला तुझी सेकंड ईनिंग सॉलिड जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻

शुक्रवार, २६ जून, २०२०

परिचारिका ...एक अनमोल सेवा

परिचारिका ( नर्स )..एक अनमोल सेवा 
--------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
26 जून 2020
--------------------------------
आरोग्य सेवा..पोलीस खाते ..सफाई सेवा यांना 
.. हल्लीच आपण कोरोनायोद्धा म्हणून घराच्या बाहेर येऊन टाळ्या वाजवल्या. 
यामध्ये हॉस्पिटलमध्ये सतत कार्यक्षमपणे कार्यरत असणाऱ्या परिचारिका यांचे कार्य अनमोल आहे.
माय लाईफ ...यामाझ्या ब्लॉग मध्ये आज लिहीत आहे.
 नर्सचा माझ्या जीवनाशी खुप जवळचा संबंध आहे. एक माझ्या जन्मापूर्वीपासूनचा संबंध असलेली *अंबुताई* ... आई-अण्णाच्या खुप जवळचे संबंध असलेली .... गावामध्ये टीका लावणे ..आरोग्यविषयक तपासणी करणे .. पण या पेक्षा एक चांगली व्यक्ती म्हणून घरात सतत अंबुताईचा उल्लेख व्हायचा. गावमळा येथे रहायची. आंबेड पासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर ...पण नेहमी चालत यायची कोळंबे.. सोनगिरी.. नंतर आंबेड ..मग आमच्या घरी आल्यावर पान खाणे आणि गप्पांचा कार्यक्रम असायचा. खरं म्हणजे आजही आरोग्यसेविका आहेत पण अंबुताई सारखी सेवाभावी नर्स पाहिलीच नाही.
माझ्या जन्माची कथा मी आई कडून खुप वेळा ऐकली आहे. 
माझा जन्म होण्याची दिवशीची घटना .....
पहाटे 3 वाजले होते आईच्या पोटात दुखु लागलं होतं ..एव्हढ्या  रात्री अंबुताईला बोलवायचं कसं ? असा मोठा प्रश्न अण्णांच्या फक्त मनात आला ..तो पर्यंत रघुतात्या आणि मोतीराम तात्या (मी दादाच म्हणतो त्याला कारण आईच्या नात्याकडून मावशीचा मुलगा म्हणून )  लगेच तयार झाले. काही गाडी वैगेरे नव्हती 
...दोघांचा पायी प्रवास सुरु झाला 
त्यांची  चर्चा एकच.. एव्हढया रात्री अंबुताईला उठवायच कसं ..
घराच्या दारात पोहचले तर घरात आवाज येत होता पहाटेचे  ४ वाजले होते . दार उघडे तर लगेच अंबुताई म्हणाली हे बघा आंबेकर गुरुजींनी माणसं पाठवली आहेत. ताई जागी झाली ती तिच्या स्वप्नामुळे ..त्यामध्ये माझी आईची डिलिव्हरी ची वेळ झाली आहे आणि ती अडचणीत आहे असं तिच्या स्वप्नात आलं होतं आणि ती दचकून उठून घरात बोलत होती .. आंबेकर गुरुजींच्या पत्नीची डिलिव्हरी ची पण तारीख जवळ आली आहे ...आणि तितक्यात माझे दोन्ही तात्या दारात उभे होते . 
...एक नर्स म्हणून  मनापासून आरोग्य सेवा  केल्याने तिची तळमळ दिसून येत होती .
...आणि तो पाई प्रवास करून  अंबुताई आमच्या घरी आली. माझा जन्म झाला. 
... पण जन्म झाल्यावर तेव्हा माझी हालचाल होत नव्हती.
दोन मुलीनंतर मुलगा झाला म्हणून आनंद होता ..पण हालचाल नव्हती म्हणून पूर्ण घरात सन्नाटा होता.त्यावेळी केवळ अंबुताईने प्राथमिक उपचार केले ..म्हणून आज मी आहे ...माझ्या रडण्याचा आवाज आला  
...आणि स्तब्ध झालेल्या घरामध्ये आनंदाची उत्सव सुरू झाला.
त्यामुळे अंबुताई ही माझ्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व असणारी नर्स आहे. 

दुसरी नर्स म्हणजे माझी पत्नी *गौरी
तिच्यामुळे आयुष्यात आरोग्यविषयक खुपच शिस्त आली आहे.(अनेक वेळेला ती शिस्त जाचक वाटते) ..पण घरातील अनेक आरोग्यविषयक घटनांमुळे संपुर्ण घर तिला फोल्लो करत असत. वडिलांना 2007 ला ब्रेन इन्फ्राक्ट झाला होता ...पण केवळ तिच्या समयसुचकतेमुळे अर्धांगवायु होण्यापासून वाचले आणि 2012 पर्यंत स्वतः चालत फिरत होते.2012 लाच आईला अचानक घशाखाली दुखु लागलं गौरीच्या लक्षात आलं की हे दुखणं नेहमीच वाटतं नाही ...हॉस्पिटलमध्ये आईला घेऊन गेल्यावर कळलं की तिला लुडविंग अन्जायना झाला आहे ...आता या रोगाचा नांव मी कधी आयुष्यात ऐकलं नव्हतं ..पण हे न ऐकलेल्या रोगाने आईच आयुष्य धोक्यात आणलं होत. घश्यातील ग्रंथींना इन्फेक्शन होऊन श्वास घेण्यास त्रास होतो. आणि हे इन्फेक्शन वाढत जाऊन जीव धोक्यात आला असता ..
आईचा पूर्णजन्मच म्हणावा लागेल कारण नॉनमेडीलक व्यक्तींना तो जीवघेणा श्वसनाचा आजार आहे हे कळलेच नसते.
...आणि म्हणूनच घरामध्ये केवळ नर्स असल्याने आज मला जन्म देणारी आई 80 वर्षापर्यंत उत्तम जीवन जगत आहे.

आयुष्य परत देणारी अंबुताई (आज त्या हयात नाहीत ) आणि आयुष्यभर सोबत राहणारी पत्नी गौरी ..या दोन्ही नर्समुळे  परिचारिका यांचे कार्य स्पेशल वाटते
...आणि म्हणूनच पी.एच.डी. च्या अभ्यासाचा विषय *परिचारिका* घेऊन अतिशय आत्मियतेने गेली ९ वर्ष अभ्यास करीत होतो

परिचारिका .... एक अनमोल सेवा  ..

शनिवार, २० जून, २०२०

वैभव मांगले.... एक अजब व्यक्तिमत्त्व (प्रसिद्ध मराठी अभिनेता)

वैभव मांगले.... एक अजब व्यक्तिमत्त्व
(प्रसिद्ध मराठी अभिनेता)
--------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
20 जून 2020
--------------------------------------
आज वैभवचा वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐
----------------------------------------
आम्ही SY ला असताना...अचानक कॉलेज कट्टयावर बातमी आली.. बाहेरच्या कॉलेज सोबत सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत आणि आपल्या कॉलेजचे इव्हेंट बसवायचे आहेत तर सायन्सच्या वैभव मांगले सोबत काम करायचं आहे. बिपीन शिवलकर पटकन म्हणाला ...कोण वैभव ..तो नटसम्राट(FY ला वैभवने नटसम्राट चा एकपात्री करून दांडेकर मानचिन्ह स्पर्धा जिंकली होती) ..ए नको तो लय शाना हाय ...आपलं जमायचं नाय त्यांच्या सोबत.. 
आपलं NSS बरं आहे. मी म्हटलं जाऊन तर बघूया .. काहीतरी विशेष असणार ...कारण पण तसंच होत...
1994 साली म्हणजे मुंबई विद्यापीठाचा 28 वा युवा महोत्सव.पहिल्यांदाच  झोनल (रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग)  सांस्कृतिक स्पर्धा होणार होती. विशेष म्हणजे आमच्या गोगटे कॉलेजमध्ये होणार होती. सांस्कृतिक विभागाचे विजयकुमार रानडे सरांनी जबाबदारी घेतली होती. आम्ही केमिस्ट्री डिपार्टमेंटला गेलो ..वैभव व्हाईट ऍप्रन घालून प्रॅक्टिकल वरून आला होता. 
चर्चा सुरू झाली....
मुकाभिनय बसवायचा होता..रानडेसरांची कल्पना होती त्यावर्षी 'तंदुरकांड हत्याकांड' झाला होता त्यावर बसवुया ... आम्हाला पथनाट्य आणि एकांकिका या पलीकडे काहीच माहिती नव्हतं. वैभव पट्टीचा ऍक्टर होता ..पण जुळून घेणं मुश्किल होतं. रानडे सर असल्याने  ते मुश्किल काम सोपं झालं होतं. 
मी ,बिपीन,वैभव, सोनाली बापट(आताची सावंत तेव्हा पण ती सावंत होती पण अधिकृत नव्हती.. तिचा मित्र असल्याने नाटकात काम करणं सोपं जायचं ...नाहीतर नाटकात काम करायला मुली कुठे भेटायच्या) केवळ नाटकात काम करण्याच्या  तयारीमुळे शक्य झालं. 
गंमतच तशी होती..
मुकाभिनयमध्ये असा सीन होता ....
बायकोचा तिच्या प्रियकरासोबत रोमान्स बघून तिचा नवरा संतापतो आणि तिचा खून करतो ..इतका क्रूर पणे की , तिच्या शरीराचे छोटे छोटे  तुकडे करून तंदूरभट्टीत टाकतो ...
बायको..सोनाली 
नवरा ..वैभव मांगले
प्रियकर..मी
सोनालीसोबत तो रोमान्स सिन  सरांना पाहिजे होता तसा  माझ्याकडुन होत नव्हता आणि दुसरीकडून वैभव अभिनयाने आग ओखत होता... 
वैभव मला म्हणाला मेल्या कसला लाजतोस ...
शेवटी सोनालीनेच पुढाकार घेऊन मला कम्फर्ट केलं. 
मग सरांनी सीन ओके केला ..शेवटी 
प्रॅक्टिस पूर्ण केली आणि मुंबईत यायची वेळ आली. ट्रेन नव्हती.. एसटीतुन प्रवास करत मुंबई गाठली ...पण मुंबईत गेल्यावर आम्ही किती मागास आहोत याची जाणीव झाली होती ..मेडल सोडा आमच्या माईम इव्हेंटच्या टेक्निकल बाजूची खुपच चर्चा झाली होती. 
वैभवने B.sc नंतर D.Ed केलं आणि नगरपरिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्याशाळेत बीपीन शिवलकरची आई शिक्षिका होती...त्यावेळी बिपींनची अचानक भेट झाली ...
वैभव शिक्षकाची नोकरी करत असताना स्टार थिएटर मधून चांगल्या एकांकिका करण्याची सुरुवात केली. तिथे मनोज कोल्हटकर, अप्पा रणभिसे,समीर इंदुलकर, प्रफुल्ल घाग यांची चांगलीच भट्टी जमली .. त्या काळात रत्नागिरीला उत्तम एकांकिका बघायला भेटायच्या मी 1999 पासूनच गोगटे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून हजर झालो होतो ...रानडेसरांनी आवर्जून सांस्कृतिकमध्ये सामावून घेतले ....आणि मग कधीही थिएटर मध्ये न मिळालेलं मेडल मिळविण्यासाठी सांस्कृतिक मंडळाची जमवाजमव सुरु केली.... पुढे पुढे कल्चरलवाले आंबेकरसर अशीच ओळख झाली. त्यावेळी वैभवच्या एकांकिका बघायला नक्की यायचो. अचानक वैभवने शिक्षकाची नोकरी सोडून कलाकार म्हणून काम करण्यासाठी मुंबईत गेला.
तेव्हा आम्ही त्याला वेड्यात काढलं. 
चांगली शिक्षकाची नोकरी सोडून जाण धाडसाचं होतं. 
पण कायम त्याची प्रगती बघून कॉलेजमध्ये त्यांच्या सोबत घालवलेले दिवस आठवायचे 
...वैभव सुंदर गातो म्हणून  ..मिडियामध्ये त्याचं कौतुक व्हायचं..
 पण आम्हाला त्याच गाणं माहीत होतं  .."उधळीत शतकिरणा" स्फुर्ती गीत एकत्र गायलं होत त्यामुळे त्याची गायकी माहीत होती. पण लॉकडाऊन मध्ये वैभवनी काढलेली सुरेख चित्र बघून थक्क झालो ...म्हटलं हे अजबच व्यक्तमत्व आहे. जसं अभिनयामध्ये कोणत्याही शेडचा रोल करतो तसच कलेमध्ये  सर्वोत्तम करतो. म्हणूनच रत्नागिरीतील पहिलं प्रॉडक्शन म्हणून झी मराठीवर प्रफुल्ल घाग नी जबाबदारी घेतलेले "एक गांव भुताचा " ही सिरीयल केवळ वैभवने  पुढाकार घेतल्याने साकार होत आहे..नाहीतर कोणीही स्वप्नात सुदधा पाहिलं नव्हतं की, रत्नागिरीतुन प्रॉडक्शन होऊ शकतं.  
वैभवला अशीच चॅलेंजिंग काम करण्यासाठी मनापासून शुभेच्छा !!!!

रविवार, १४ जून, २०२०

महाराजा ....30 वर्षांचे मैत्रीपर्व

महाराजा....30 वर्षांचे मैत्रीपर्व
----------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
14/06/2020
----------------------------------------
आयुष्यात मैत्री कधी सांगून होत नाही...किंव्हा आजपासून आपली मैत्री संपली. असं सांगून संपत नाही ...आणि सांगून मैत्री संपते ती मैत्रीच नसते. 
1991 ते 2020 अश्या 30 वर्षांच्या अभेद्य मैत्रीच्या ग्रुपमध्ये 11 मित्र आणि आता परिवार (आई वडील,बायको मुलं)सुद्धा. हे  एक-एक करून  11 मित्र व्हायला 3 वर्ष लागली. 
2005 पासून गेली 15 वर्ष महाराजा मैत्रीची आठवण म्हणून आमच्याच गोगटे कॉलेज मध्ये *महाराजा करंडक* हा इव्हेंट मॅनेजमेंटचा करंडक प्रायोजित करतो. जो आजच्या कॉलेजच्या स्टूडेंटचे स्वप्न झालं आहे.. यावर्षी आपल्या क्लासने महाराजा करंडक मिळवायचा म्हणून कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ग्रुप करायला सुरूवात करतात. पण तो करंडक मिळविण्यासाठी सॉलिड ग्रुप असावा लागतो... त्यात बॉंडिंग असावं लागतं ... तरच हा करंडक  मिळतो.
पण मुळात माझ्या महाराजा ग्रुपच बॉंडिंग सुरु व्हायला 1991 पासून सुरुवात झाली.
मी 1990 ला रत्नागिरीत आलो. 1 वर्ष दहावीच्या अभ्यासाचं टेन्शनमुळे सुनील सावंत पोलीस लाईन मधील मित्रा व्यतिरिक्त कोणीच मित्र नव्हता.  सुनीलच्या आईच म्हणणं होतं मी फाटक ज्युनियर कॉलेजला जावं कारण तुझ्यासारख्या सरळ मुलाचं  गोगटेमध्ये  काही खरं नाही. तेव्हा मला कळलं नव्हतं पण जेव्हा कॉलेजच्या पहिल्याच दिवशी सिनियर पोरांनी *शाळा* (आता त्याला रॅगिंग म्हणतात) घ्यायला सुरुवात केली होती.माझ्यावर कधी झाली नाही ..पण आपला स्ट्रॉंग ग्रुप असणं गरजेचं आहे असं वाटायला लागलं .कॉलेजमध्ये तुफिल पटेल मित्र झाला ..पण तो कोतवड्या गावातून 20 एक किलोमीटर वरून यायचा त्यामुळे लगेच घरी जायचा. 
नवीन कॉलेज.. नवीन पॅशन आपली बॉडी सॉलिड असायला पाहिजे ...पोलीस लाईन मधील पोरं पोलीस भरतीसाठी माळनाक्यावर जिम मध्ये जायचे मी पण जायला सुरुवात केली. आणि तिथेच महाराजा ग्रुप जमायला सुरुवात झाली. *हेमंत मांडवकर* (सद्या भूमिअभिलेख ऑफिसमध्ये काम करतो)आणि *राजू जाधव*(सद्या काय करतो हे सांगता येणार नाही ..पण हा काही करत असतो अगदी आमदारकीला पण उभा होता) हे एसटी कॉलनीतून दोघे जीममध्ये यायचे त्यांना मी बघायचो म्हटलं ही आपल्या क्लास मधीली पोरं दिसत आहेत.
एकदा किस्साच झाला... आम्ही सकाळी खुप लवकर जायचो म्हणून  जीमचे दिनकर सर कधी पाहिलेच नव्हते. ते एक दिवस अचानक सकाळी लवकर आले .. बाकी पोरं कुजबुजु लागली ...एरव्ही मस्ती करणारी पोरं शिस्तीत व्यायाम करायला लागली .मी नवखा असल्याने त्यांना घाबरून जास्तच व्यायाम केला. तेव्हा काही वाटलं नाही पण दुसऱ्या दिवशी पूर्ण अंग सुजल होतं. त्याच्या पुढे 8 दिवस जीममध्ये काही जाणं शक्यच नव्हतं . कॉलेजला हेमंतला हळूच विचारलं दिनकर सर येतात कारे सकाळी ...तो म्हणाला नाही रे ते फक्त त्याच दिवशी लवकर आले होते. मग मला अंगाला सूज आल्याचा किस्सा सांगितला तो हसून मेला ...मग आमची दोस्ती झाली.. राजू जिम मध्ये सिरीयसली व्यायाम करायचा ...पुढे जाऊन तो कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट झाला.पण माझ्या आणि हेमंतच्या ऊंगल्या सुरू असायच्या.माझं एसटी कॉलनीत जाणं वाढलं ...बरेच दिवस गेलो नाही तर हेमंत आणि राजूची आई रागवायची कुठे गेला होतास इतके दिवस म्हणून ... 
अचानक एक काळा गॉगल घालून साधा मुलगा वर्गात आला तो म्हणजे *सचिन सावंत* (सद्या अनेक बँकांचे रिकव्हरीचे काम करतो )तो खूपच साधा असल्याने वात्रट पोरं  (पम्या घोसाळे, गुरू शिवलकर आणि इतर)त्याला टार्गेट करत होती ..मग तो माझ्या जवळ बसायला  लागला.
हळू हळू एव्हढी मैत्री झाली की FY ते TY नंतर त्यांच्या घरीच पेइंगगेस्ट म्हणून रहायला गेलो कारण भाऊजींची बदली राजापूरला झाली होती. सचीनचा माझ्यावर एव्हढा जीव होता की ... एकदा त्यांच्या आईने मला रूम खाली करायला सांगितला तर हा चवथाळला ...आनंद गेला तर मी पण घर सोडणार . आईचा राग कमी झाला ..आणि आज प्रत्येक सुखदुःखात मी सावंत फॅमिलीत असतोच. यादरम्यान *राजश्री बंदरकर* (नगरसेवक होती सद्या भाजप महिला शहर प्रमुख आहे) आम्हा सर्वांची मैत्रीण झाली. तिची अचानक आई देवाघरी गेल्याने आमचं घरी जाण सुरू झालं. मग आम्ही तिची काळजी घेऊ लागलो. 
बारावीत ट्रिपचा विषय सुरू झाला. तेव्हा विद्यार्थीच आयोजक असायचे मोठे मोठे बॅनर लागायचे .प्रशांत सुर्वे आणि *बिपीन शिवलकर*( भाजपा एकनिष्ठ लीडर आणि यशस्वी उद्योजक विशेष म्हणजे राजश्रीशी लग्न होऊन यशस्वी संसार करत आहेत) नी मला आयोजक म्हणून आपल्या सोबत घेतलं. बिपीनची व्यवहारातुन मैत्री सुरू झाली आणि आज 30 वर्ष अनेक आर्थिक व्यवहारात आम्ही दोघे एकमेकांचे जामीनदार असतो एवढा विश्वास वाढला आणि कायम आहे.
सिनियर कॉलेजमध्ये आल्यावर ऍडमिशनचा फॉर्म भरताना विनोद घाडीचा(दुर्दैवाने अपघाताने हयात नाही) मित्र म्हणून *राजा घाग* (सद्या नाचणे ग्रामपंचायत मध्ये जबाबदार कर्मचारी आहे)शी ओळख झाली. राजा मितभाषी पण मैत्रीला एकदम पक्का.वर्गापेक्षा कट्ट्यावर वेळ जाऊ लागला.मनोरंजनचा हुकमी एक्का म्हणून बाळा म्हणजेच प्रशांत बापर्डेकर(सद्या गद्रे मरिन कंपनीत परचेस मॅनेजर आहे.)हवासा वाटायला लागला. 
...अचानक एक मुलगा कट्ट्यावर  कॉमर्सच्या पोरांची तक्रार घेऊन आला मग मी आणि राजू बघायला गेलो ...तर आम्ही बाजूलाच .. त्या पोराला यानेच ठोकून काढलं तो होता *सुजित कीर* (व्यवसायाने वकील पण शिवसेनेत मोठा नेता ..प्रदेश युवा सेना सदस्य आहे). आता शांत असतो पण नेहमीच वेगळं करण्यात धाडसी ...त्याच्या कल्पना ऐकूण आम्हाला घाम फुटतो. FY ला विद्यार्थी निवडणूका झाल्या त्यामध्ये माझ्या विरोधी उभा असलेला *दैवत कडगावे* (सद्या स्कुल मध्ये शारीरिक शिक्षक या अगोदर सहारा कंपनी लोणावळा येथे काम करत होता) आणि जोडगुळी *संदेश कीर* (हा काय करतो ते फक्त तोच सांगू शकतो..काही वर्षे कँपनी कॅन्टीन चालवायचा) याची "महाराजा एन्ट्री"  जबरदस्त होती. निवडणूका होऊन गॅदरिंगचे दिवस सुरू झाले होते. अचानक बातमी आली FY च्या CR आनंद आंबेकर वरून तेलीआळी नाक्यावर मारामारी झाली... म्हटलं आम्ही काही केलं नाही ..भानगड केली कोणी ..सुजित तर त्यावेळी पावसला रहायचा.. नंतर कळलं आमचा कट्ट्यावर ग्रुप वाढायला लागला होता याबद्दल नाक्यावर SY ची पोरं चर्चा करत होती ..FY च्या आनंद आंबेकरला ठोकायला पाहिजे ....हे दैवतनी ऐकलं आणि झाली बाचाबाची होऊन मारामारी झाली होती (तो मित्र नव्हता पण FY चं स्पिरीट म्हणून भानगड..)  गॅदरिंग मध्ये FY  च्या पोरांना टार्गेट करायचं असा प्लॅन होता ..पण आम्ही हाणून पाडला यातच दैवत आणि संदेश मित्र झाले.मी-हेमंत पार्टटाईम जॉब म्हणून STD मध्ये काम करायला लागलो.. तिथे  *सतीश नाईक* (सद्या idea कँपनीत टेक्निकल जॉब करतो) नंतर पुढच्यावर्षी कॉलेजला ऍडमिशन घेतलं. 
 11 जण 11 टोकाच्या स्वभावाचे कोणाचं कोणी ऐकणं नाही ..जो तो राजा सारखं राहणार म्हणूनच महाराजा नांव ठेवलं आणि कायम राहिलं. आजही जबरदस्त मतभेद असतात ...पण प्रसंग आला की तुटून पडतात . 3 महिन्यांपूर्वी हेमंतचा बाईक वरून अपघात झाला तर त्याचं कुटुंब बाजूलाच अक्खा महाराजा परिवार झटत होता ...संदेश आजारी पडला तर हॉस्पिटलमध्ये आमचीच गर्दी ... माझं कार अपघात झाला तेव्हा हे सर्व हजर..  अश्या वेळी आमची घरची माणसं रिलॅक्स असतात ..हे अगदी आत्ताचं ..पण
आमची सर्वांची लग्न ठरवण्यात सुद्धा महाराजा ग्रुप यजमान म्हणून काम करत होता. 
.. आता 11 मित्र नव्हे तर 11 परिवार एकत्र असतात.  
 *आजच्या असुरक्षिततेच्या काळात  11मित्र -फॅमिली हमखास एकत्र आहोत हिच भावना महाराजा जीवन जगायला रिलॅक्स करते.*

बुधवार, १० जून, २०२०

लाईफपार्टनर


लाईफ पार्टनर 
--------------------------------
आनंद आंबेकर
10/6/2020
--------------------------------
ती ...18 वर्षांपूर्वी आयुष्यात आली. कशी आली ? जशी प्रत्येकाच्या आयुष्यात येते तशीच ती आली.आई अण्णांचा लग्नासाठी सतत पाठपुरावा.माई, बेबी (बहिणी)चा सततचा आग्रह त्यात दोन वर्षांनी लहान पण मित्रांसारखा भाऊ महेश याचं ही लग्नाचं वय झालेलं दोन्ही भाऊ सेटल्ड असल्याने उशीर करण्याचे कारण नव्हते .तिचा स्वभाव आणि माझा स्वभाव म्हणजे दोन टोक असली तरी मध्य साधता साधता 18 वर्ष गेली. काय जादू आहे या नात्यात कुणास ठाऊक. आठवतो  तो दिवस ....
18 वर्षा पूर्वी संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर ती आणि तिचे पालक गावचं (आंबेड) घर बघायला येणार होते. माझ्यासोबत मित्र होते.किरण आणि उदय .मी अगोदर मालवणला जाऊन आलो होतो. पण निर्णय झाला नव्हता .. स्टेशनवर गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घालून ..चेहऱ्यावर जबाबदारीचे भाव . किरण  सहज बोलून गेला बोलून गेला.. आनंद आता जमलं तुझ लग्न. उदय सहसा प्रतिक्रिया नदेणारा पण म्हणाला चांगली फॅमिली आहे.  मला तर काय सुचतच नव्हतं ..मला वाटतं अरेंज मॅरेज करणाऱ्याची अवस्था अशीच असते...." होऊ दे एकदाचं ". माझा महाराजा परिवार (कॉलेज मित्र)तर यजमानाच्या भूमिकेत होता. कॉलेजचं सांस्कृतिक मंडळ जोरदार सेलिब्रेशन मूड मध्ये होते .. नातेवाईक आपआपल्या जबाबदाऱ्या नसांगता पार पाडत होते. लग्न झाल्यानंतर  नर्स असल्याने हॉस्पिटल बदलीमुळे नवीन जिल्हा ..नवीन कार्यपद्धती ..नवीन रिलेशन आणि नवीन संसार . कधी आंबेडच्या जबाबदाऱ्या  टाळल्या नाहीत ...कधी माझा मित्र परिवार परका मानला नाही ... माझ्या इतर ऍक्टिव्हिटीच्या जबाबदाऱ्यामध्ये अडथळे आणले नाहीत. दोन मुलं झालीत ..एव्हढ्या जबाबदाऱ्या सांभाळून सुदधा आम्ही दोघांनीही लग्न झाल्यानंतर दोन दोन शिक्षणाच्या पदव्याचा अभ्यास केला तीच लास्ट इयर ला असताना नर्सिंग ला ऍडमिशन झालं त्यामुळे BA राहिलं होत. ते पूर्ण केलं नंतर MA पूर्ण केलं...ते पण मराठी स्पेशल  मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून. मला MPhil. आणि PhD साठी सहकार्य केलं. खरं म्हणजे आम्ही दोघंही आपापल्या कॉलेजमध्ये असताना ऍक्टिव्हिटी मध्ये ऍक्टिव्ह होतो.
 ती NCC आणि स्पोर्ट्स मध्ये ऍक्टीव्ह असायची तर मी NSS आणि सांस्कृतिक मध्ये . 
स्वत:च्याच कॉलेजला जॉब मिळाल्याने आणि स्वभाव व्यस्त राहण्याचा असल्याने तिला नेहमीच घरच्या जबाबदाऱ्याचा ताण येतो ...पण ती करते ऍडजेस्ट 
ती आरोग्य विभागात नर्स असल्याने घरी नेहमीच आधार असतो .
एक प्रसंग असा की जो आयुष्यात कधीच विसरू शकत नाही...अचानक एक दिवस पुतण्याचा (अभिषेक) फोन आला माईच्या पायातुन रक्तस्त्राव होऊन माई (माझी मोठी बहीण) बेशुद्ध होत आली आहे. बहिणीला संधिवात होता तिच्या पायाला मोठया जखमा होत्या.
माईच्या त्या प्रसंगात एव्हढ्या तत्परतेने हॉस्पिटलमध्ये तीने निर्णय घेतले  त्यामुळे तीचा जीव वाचला (दुर्दैवाने आज ती आमच्यात नाही) .हॉस्पिटलमध्ये माई जेव्हा शुद्धीत येत होती तेव्हा तीच नाव घेत जाबडत होती माईला बेशुद्ध अवस्थेत सुद्धा '' तिच्यावर" विश्वास होता. ..ती आहे गौरी.घरच्या लोकांचा इतका विश्वास नक्की मिळवला आहे.
पत्नीही  "अंश काळाची सखी आणि दीर्घ काळाची माता असते." हा निसर्गाचा नियम आहे ...पत्नीने मातेचे रूप घेतले की, मग दोघेही दबावात राहू शकतात. म्हणून  दोघे ही जबाबदारीच्या क्षेत्रात काम करताना लाईफपार्टनर ची लाईफफ़्रेंड झाले तर जीवन खुपच सहज आणि सुंदर होऊन जाते. यासाठी माझा कायम आग्रह असतो आणि तिचा पाठिंबा असतो.म्हणूनच ती घरात..नातेवाईकांमध्ये..मित्रांमध्ये..माझे व्यवसाय सहकारी फॅमिलीमध्ये सर्वांमध्ये सहज मिसळते. 
खरं म्हणजे आम्ही दोघे अतिशय विरुद्ध स्वभावाचे आहोत ... पण लाईफपार्टनर ची लाईफफ़्रेंड सूत्राने सहज जीवन जगायला मदत होत आहे.

सोमवार, ८ जून, २०२०

एक अनामिक प्रेम

एक अनामिक प्रेम...
(तू आयुष्यात आल्याच 10 वं वर्ष )
----------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
8 जून 2020
----------------------------------------
आज तुला माझ्या आयुष्यात येऊन 10 वर्ष पूर्ण झाली. तू माझ्या आयुष्यात यावी म्हणून 
मी अनेक वर्ष तुझी स्वप्न पाहिली. रात्र रात्रभर तुझीच स्वप्न रंगवली. तू अशी दिसायला हवीस...तुझी उंची एव्हढी असावी .. तू आयुष्यात आलीस ...आणि सर्व आयुष्यच व्यापून गेलीस.माझ्या सवयी बदलल्या ..छंद बदलले .मी खूप वेळ तुझ्यासोबत घालवायला लागलो. 
तू 10 वर्षापासून अगदी वेडं केलंस . तुझे फोटो फेसबुकवर बघून माझ्याकडे कधीही नयेणारी  माणसं सुद्धा म्हणायला लागली.. तुला बघण्यासाठी तरी माझ्याकडे यायला पाहिजे.असं तुला महत्व देऊन बोलतात तेव्हा मला अजिबात तुझ्याबद्दल आकस वाटत नाही ...कारण तुझं सौंदर्य अजून खुलाव म्हणून मीच प्रयत्न करत असतो. दिवसातून तासन्तास तुझ्यासोबत घालवत असतो...तेव्हा माझी बायको खूप रागावते ...म्हणते ही यांच्या आयुष्यात येऊन मला जणू काही सवतच आली आहे. तुझं सौदर्य खुलाव म्हणून पैसे खर्च करतो तेव्हा तर बायकोचा पाराच चढतो. ...मग होतं  भांडण ...पण तुझ्या प्रेमापोटी सुवर्णमध्य काढतो. बायको घरी असताना तुझ्या सहवासात येत नाही ...तुझ्यावर खर्च करण्यासाठी बायकोपासून लपून बाजारात जातो. तुझ्यावर खर्च केलाच तर किंमत कमी करून सांगतो ...  
तू आयुष्यात आल्यामुळे माझं बालपणापासूनच गार्डनिंगच स्वप्न पूर्ण झालं.. 
आंबेडला (माझं गांव)बालपणी गार्डनिंगची हौस म्हणून लोकांच्या पडक्या घराच्या चौथर्यावर झाड लावली होती.
अभ्यासाला गार्डनमध्ये बसणं...कधी कधी आंघोळ करणं असा आनंद घेत होतो .अचानक एकदा घरच्या चौथऱ्याचा मालक गावी आला आणि आई वडिलांशी जोरात भांडण केलं ...ही झाड लावून आमची जागा हडप करायची आहे का ? मास्तर असून असं तुम्हाला शोभत नाही ....वगैरे ...वगैरे.. आयुष्यभर लोकांना मदत करणाऱ्या वडिलांना माझ्यामुळे बोलणं खावं लागलं होतं ... अण्णा (वडील) रागारागाने गार्डन मध्ये आले आणि सर्व झाडं उपटून टाकली. माझा जीव जीव तीळ तीळ मरत होता.. मी अडवयला गेलो ...पण अण्णांचा पारा चढलेला होता. मला चांगलाच चोप दिला. खरं म्हणजे शोभेच्या झाडाने आणि केळीच्या झाडांनी काही त्यांचा चौथरा फुटणार नव्हता ...पण सर्व भानगडीत माझं गार्डनिंगच स्वप्न उद् वस्थ  झालं होत 
...आता तू आयुष्यात आल्याने माझं हे स्वप्न पूर्ण झालं होतं. फेसबुक.. इन्स्टाग्राम...व्हाट्सअप वर गार्डनिंग सोबत माझ्या फोटोग्राफीची ही हौससुद्धा पूर्ण होत आहे.
मला गोतावळ्यात राहण्याची खुप सवय आणि आवड आहे. पण 10 वर्षापूर्वी मला मित्र ..नातेवाईक.. माझे विद्यार्थी यांना बोलवायचं म्हणजे अडचण असायची पण आता तू असल्याने निसंकोच हा गोतावळा येतो...आयुष्य जगल्यासारख वाटतं. आयुष्यात जीवाभावाची माणसं नसतील तर काय मजा नाही. 
10 वर्षा पूर्वी तू फडक्यांची होतीस. तुला माझ्या स्वाधीन करून पुण्याला जाता जाता फडके काकी म्हणाल्या ...आमची मुलगी देतोय तुम्हाला ...आता तुम्ही सांभाळा 
... 2010 ला फडक्याकडून तू माझ्या आयुष्यात आलीस  तरीही तुझ्या प्रेमापोटी एक दोन वर्षांनी फडके कुटुंब खास तुला बघण्यासाठी येतच राहील ... 2015 ला तुझं सौदर्य बदललं तेव्हा ..फडके काकी आल्या होत्या तेव्हा त्यांना मी  विचारलं तूम्ही मला दिलेली मुलगी आता कशी दिसते ... काकी म्हणाल्या माझ्या कल्पनेच्या पलीकडे तुम्ही तिची काळजी घेत आहात. 
मी काकींना म्हणालो ...
सुंदर वास्तू असावी हे माझं स्वप्नं होत म्हणूनच एव्हढं तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. 
असं हे माझ्या वास्तूवरील अनामिक प्रेम.

रविवार, ७ जून, २०२०

बेस्ट मोटिव्हेटर.. कै. प्रा.संजय जोशी

----------------------------------------
बेस्ट मोटिव्हेटर.. कै.प्रा.संजय जोशी
----------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
7 जून 2020
----------------------------------------
गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरीच्या अनेक आघाड्यांवर अग्रेसर नांव असायचं म्हणजे कै. प्रा.संजय जोशी. महाविद्यालयात ते उपप्राचार्य ..समाजशास्त्र विभागाचे प्रमुख ..NSS चे कार्यक्रम अधिकारी.. रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण कार्यक्रमाचे संयोजक ..अश्या अनेक भूमिकेत जोशीसर भेटले. 
... पण माझ्यासाठी ते माझे मोटिव्हेटर म्हणूनच जास्त भावले. FY ला महाविद्यालयात प्रवेश घेतल्या नंतर अनेक Extra ऍक्टिव्हिटी चे प्रवेश सुरू झाले होते. 8 वी ते 10 वी स्काऊट चा विद्यार्थी असल्याने NSS मध्ये भाग घ्यायचं नक्की केलं. 12 वीला याच कॉलेजमध्ये असल्याने आणि त्यात 12वीला असताना 3 दिवसांची गोवा ट्रिप यशस्वी आयोजन केल्याने आत्मविश्वास जबरदस्त वाढला होता.nss ऍडमिशन होण्यासाठी वेगवेगळ्या रूममध्ये बोलण्यात आलं मी रूम नंबर 15 मध्ये होतो. समोर जोशी सर होते ..सर म्हणाले इकडे ये नवीन आहेस ना ...बोल काय येत तुला मी म्हटलं सर मी रूम नंबर 2 मध्ये बोर्ड लिहिण्याचं दाखवून आलो आहे. बर ठीक आहे ...एका दुसऱ्या मुलाला उठवलं तो TY चा राजेश सुर्वे होता (अगोदर ओळख असण्याचा प्रश्नच नव्हता) सर म्हणाले तुम्ही दोघे भाऊ आहात असं समजा आणि तुमचं भांडण सुरू आहे असं ऍक्टिग करून दाखवा.... ऍक्टिग आणि मी अंगावर काटा आला होता ..मी 5 वीत असताना गुरुजींचा मुलगा म्हणून कृष्ण होऊन मोठया मुलींच्या (शाळेत असताना माझ्या उंचीच्या मुली नसल्याने कायमच मला मी लहान असल्यासारखं वाटायचं आणि गुरुजींचा मुलगा म्हणून लाड करून घ्यायचो )मध्ये बासरी घेऊन उभं केलं होतं..एव्हढाच काय तो स्टेजचा अनुभव पण आज जोशीसरांनी विचार करायलासुद्धा वेळ दिला नव्हता...
आमची वेळ आली आणि आम्ही दोघांनी काय केलं ते केलं ...डोळ्यासमोर पांढरा पडदा आला होता..टाळ्या वाजायला लागल्यावर संपलं वाटत याची जाणीव झाली ...बाकी विद्यार्थी भारी केलात रे असं म्हणत होते...पण माझी काय अवस्था झाली  होती ते मलाच माहीत. सर्वांच्या मुलाखती झाल्या आणि जोशीसरांनी मला nss कलापथक ग्रुपचा प्रमुख केला. जोशीसरांनी त्यावेळी माझ्यात काय पाहिलं कुणास ठाऊक पण तोच विश्वास घेऊन गेली 12 वर्ष मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवासाठी जिल्ह्यातील सर्व  कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक क्षेत्रात मोटिव्हेट करायचे काम करत आहे. 
जिल्ह्यातील इतर कॉलेजमध्ये काम करण्याची संधी सुद्धा जोशीसरांनीच सर्व प्रथम दिली होती. Nss चे जनजागृती अभियान मुंबईमध्ये होणार होते .. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमध्ये 2 ते 3 विद्यार्थी सहभागी करून एक जनजागृतीचा कार्यक्रम करायचा होता . 
मी TY ला होतो ..आमच्या कॉलेजची 2 मुलं मलाच सिलेक्ट करायची होती. FY ला विद्यार्थी निवडणूका झाल्या होत्या माझ्या विरुद्ध 11 जण उभे होते. खूप राडे ..भानगडी.. धमक्या..आमिष ....शेवटी मी निवडून आलो होतो  
यामुळे स्वतःचा महाराजा ग्रुप तयार झाला होता...ग्रुपला सांभाळण्यात जास्त वेळ जायचा..माझ्यासमोर धर्मसंकट होतं त्यातील बरेचशे कलाकार मित्र SY आता nss ला आले होते ...पण मला व्हर्सटाईल आणि हुकमी कलाकार निवडायचे जाते . मी अजिबात मागे पुढे नबघता कार्यक्रम ऊत्तम होण्यासाठी  गाणारा..ऍक्टिग करणारा आणि ढोलकी वाजवणारा सचिन लांजेकरची निवड केली आणि ऍक्टिग चा हुकमी एक्का गुरू शिवलकर येणार होता.जोशीसरांची विश्वास टाकण्याचा गुण जबरदस्त होता ..तो आम्हाला प्रामाणिक रहायला भाग पाडायचा.. आणि प्रेशर सुद्धा यायचे.
ती रात्र आठवते ...
माणगांवला सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी एकत्र आले होते ..ओळख सुद्धा नव्हती .. जोशीसरांनी स्क्रिप्ट दिल ...रात्री 10 वाजेपर्यंत काहीच जमत नव्हतं ..सरांच्या चेहऱ्याकडे पाहिलं सर नाराज होते ..नंतर सर निघून गेले  रात्री मी जाबडत उठलो ..गुरू म्हणाला काय झालं .. नाही रे सर नाराज आहेत आपल्याला काय जमत नाही. मग आम्ही सर्व मेन रोल आमच्या तिघांकडे घेतले आणि नझोपता प्रॅक्टिस सुरू केली. 
दुसऱ्या दिवशी परफॉर्मन्स होता .. आमचा शेवटून 2 नंबर होता ..मुंबईच्या पोरांचे कॉन्फिडन्स बघून आमची गावठी पोरं बिथरली होती. जोशीसरांचा नाराज चेहरा डोळ्यासमोर सतत येत होता .. जिल्यातील सर्व पोरांना एकत्र केलं आणि नाटकाच्या भाषेत जोरात पेटवलं ..परफॉर्मन्सच्या अगोदर सर आले ...जोरात करा ..घाबरू नका... मी सरांना म्हटलं ..सॉरी सर थोडे बदल केले आहेत... सर म्हणाले आता त्याचा विचार करू नका बिनधास्त करा..., बास सर भेटून गेले होते.. पोरं एकदम पेटली होती
..., आणि जो काही परफॉर्मन्स झाला ... जोरदार टाळ्या ..शिट्या  
दुसऱ्या दिवशी तर कलाम झाली होती मुंबई सकाळ पेपर ला आमच्या परफॉर्मन्सचा फोटो आला होता (अजून जपून ठेवला आहे).मुंबई मधील पेपर सुद्धा जोशी सरांनी आणून दिला होता.
...जोशीसरांची विश्वासाने विश्वास वाढविण्याची हिम्मत आज ही अनुकरण करायला लावते.
आज जोशीसर हयात नाहीत ..पण एक मोटिव्हेटर म्हणून सतत सोबत असल्याची जाणीव होते ...आणि नकळत त्यांच्या सारखं मोटिव्हेटर होण्याची प्रेरणा मिळते.

मंगळवार, २ जून, २०२०

ग्रेट पर्सनॅलिटी ...ग्रेट मेमरीज

प्रा.अरुण यादव...एक ग्रेट 
सहकारी 
----------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
2 जून 2020
----------------------------------------
आज सरांचा वाढदिवस आहे....
💐💐💐💐💐💐💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
----------------------------------------
1999 पासून गेली 21 वर्ष आम्ही दोघे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून एकत्र आहोत. माझे सिनियर आहेत ..पण कधीच सिनियारीटी  दाखवली नाही. ना कधी.... कॉलेजला असं वाटतं म्हणून तुम्हाला असं करावं लागेल (असं आडून पण कधी दबाव ठेवला नाही) यादव सर म्हणजे एक माणूस म्हणून सतत माणुसकी जपणारा माणूस .. मला हाक मारताना सुद्धा 'ए मानसा' आहेस कुठे असच बोलणार ..त्याच्या साधेपणामुळे मग अनेकवेळा स्वतः त्रास करून घेण्यास तयार असतात त्यांच्या या स्वभावामुळे मीसुद्धा कधी कधी त्याच्यावर  रागावतो ..तुम्ही एव्हढे सिनियर आहात ...आणि कशाला सफर होता . 
दिलेलं काम निमूटपणे करणे ही त्याची खासियत ..म्हणून प्रत्येक सिनियर आणि ज्युनिअर ला यादवसर  सोबत हवे असतात. 1999 ला NSS मध्ये प्रोग्राम ऑफिसर म्हणून काम करत होते तिथे सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे काम करायचे 
आता NCC ऑफिसर म्हणून काम करताना सुद्धा मूळ साधेपणाचा स्वभाव बदलला नाही. FC मध्ये आम्ही काम करत असताना त्यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव जमीन आसमानाचा फरक .....
तरीही मला सतत प्रोत्साहित करत असतात . 
2006 मध्ये चिपळूण डी बी जे कॉलेजला FC चा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी वर्कशॉप होता..ते सिनियर होते तर ते स्वतः जाऊ शकले असते पण यादवसरांनी मला जायला सांगितले आणि ती संधी मिळाली म्हणूनच आज तागायत सुरू असलेला  करियर मार्गदर्शन ..ताण तणाव व्यवस्थापणाचा आदर्श अभ्यासक्रम तयार करता आला. गेल्या चार वर्षात BMS आणि बायोटेक्नॉलॉजी सारख्या प्रोफेशन कोर्स ला सुद्धा आम्ही तयार केलेला अभ्यासक्रम डिग्री साठी कंपल्सरी करण्यात आला आहे. आपण तयार केलेला अभ्यासक्रम इतका आदर्श होऊ शकतो यांच्या सारखा स्वत:च्या प्रोफेशन मध्ये आनंद काय असू शकतो ...हे जे लोक स्वतःच्या प्रोफेशनमध्ये समाधान शोधतात त्यांनाच कळू शकते ...हा आनंद केवळ यादव सरांनी दिलेल्या संधीमुळे आयुष्यभर घेत आहे.
इतकंच काय...
त्यांची मुलगी गेल्यावर्षी कॉलेजला FYBsc ला आली तर तिची वर्गाची तुकडी माझ्याकडे दिली आणि आवर्जून विश्वास दाखवला आणि म्हणाले , मानसा ..मुलगी तुझ्या कडे FC ला असली की, तू वर्गात नेहमीच काहींना ना काही ऍक्टिव्हिटी घेत असतोस श्रुती जरा स्मार्ट होईल . इतका साधेपणा खरचं सहसा कुठे दिसत नाही. 
त्याच्या साधेपणाचा एक मजेशीर किस्सा  आहे.....
गणपतीची सुट्टी होती ..
सुट्टीला जाण्यापूर्वी सरांना म्हणालो तुम्ही गावाला जात नाहीतर माझाकडे गणपतीला या ...सर म्हणाले..फॅमिलीसहित नक्की येतो.  15 -16 वर्षात पहिल्यांदाच सर पहिल्यांदाच घरी येणार होते.
गणपतीच्या दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आला ...मानसा स्टॉप जवळ आलोय घरापर्यंत कसं यायचं सांग. मी खूप उत्साहात होतो ..फोन वरूनच बोलायला लागलो ..रोडवरून सरळ या ..मध्ये मंदिर दिसेल मग मी समोरच उभा असेन ..सर म्हणाले ठीक आहे फोन चालू ठेवा ..मी पुढे पुढे येतो थोडयावेळाने फोन वरून म्हणाले मंदिर कुठे दिसत नाही ... लोकांना विचारलं तर म्हणतात मंदिर गोडाऊन स्टॉपला आहे....
काय घोळ झाला होता ते कळल्यावर  मला जोरात हसायला आलं  
सर माझ्या (नाचणे)रत्नागिरीच्या घरी आले होते..आणि मी गावच्या आंबेडच्या घरच लोकेशन सांगत होतो. मी कायमच गणपतीला गावी जातो ...मला वाटलं सरांना माहीत असेल .. ते पण हसायला लागले सोबत फॅमिली असल्याने मला खुप वाईट वाटलं मी तसं त्यांना म्हणालो ...उलट सरच मला समजावत होते जाऊद्या हो माझंच ऐकण्यात चूक झाली असेल ... सरांचा इतका साधेपणा अनेक वेळा त्यानांच अडचणीत आणतो 
आमच्या दोघांमध्ये स्वतः जबाबदारी घेऊन काम करण्याचा कॉमन फॅक्टर असल्याने 
अनेकजन  नेहमी बोलतात ही 
पायाभूत अभ्यासक्रमाची दोन भूत कायम कॉलेजवरच असतात 
...म्हणूनच कदाचित गेली 21 वर्ष आमचं कधीच कामाच्या बाबतीत गैरसमज झाले नाहीत... की खटके उडाले नाहीत. 
एकाच कॉलेजमध्ये ...एकाच विषयाला शिकवत असताना असं सहज प्रोफेशन मध्ये राहणे खुप मुश्किल आहे. 
मी खूप नशीबवान आहे की यादवसरांसारखा सहकारी मिळाले.
–---------------------------------------------------------
Prof. Arun Yadav ... a great
 Collegue
 ----------------------------------------
 Prof. Anand Ambekar
 June 2, 2020
 ----------------------------------------
 Today is Sir’s birthday ....
 💐💐💐💐💐💐💐💐
 Happy birthday
 ----------------------------------------
 For the last 21 years since 1999, we have been together as a professor at Gogte Joglekar College.  He is my senior, but never showed seniority.  College thinks so you have to do it (but he never pressurized on it). Yadav Sir is a man who is always looking for humanity. Even when you call me, he calls me as 'A Mansa ahes kuthe' (Hey! Where are you?).  Because of his simplicity, he is often ready to bother himself. And his this nature sometimes makes me angry and I tell him that ‘You are senior and you should not bother urself much’.
 His specialty is to do the given work in a timely manner. So every senior and junior wants to be with Yadav Sir.  In 1999, while working as a program officer in NSS, He used to work very honestly
 Even now working as an NCC officer has not changed his nature.  The difference between his nature and my nature is like te difference between land and sky while we are working for the same subject i.e FC.
 Still, he is constantly encouraging me.
 In 2006, Chiplun DBJ College had a workshop to prepare FC curriculum. He was a senior, he could have gone himself, but Yadav Sir told me to go and grab the opportunity. And because of that it was possible for me to make curriculum based on carrier guidance and stress management. Over the last four years, this syllabus is compulsory even for professional courses like BMS and Biotechnology. What can be more delightful in one's own profession then seeing the curriculum we have created has become ideal. This can only be known by those who seek satisfaction in their own profession ... This happiness is only because of the opportunity given to me by Yadav Sir.
That's all ...
Last year his daughter joined college and he gave me her divisionto teach and told me that “ You always push students in different types of activities which enhance their personality, So she will become smart if you teach her division”. Such an incredible simplicity is rare in people nowadays.
There’s an interesting story regarding his simplicity .....
 It was Ganpati vacation…
Before going to vacation I asked sir wheather if he is not going to his native village then probably he should join us at our village. The answered with a positive response saying that he’ll surely visit my village with his family. He was going visit my first time since last 15-16 years.
On the second day of the Ganpati celebration , he ranged me saying “ “ (Mansa!) I’m at the stop guide me the route to your house”. I was so excited that I started guiding him on the phone itself, ‘First continue the straight road then you will find a temple and  I will standing there waiting for you’. He told me ill come! , wait! , hang on bit! and aftersometimes he told me that there is no temple and they are saying temple is at godown stop.
After understanding the situation I got know that he was at my home in Ratnagiri and not my village (Ambed) and I started laughing loudly. I thought he might have known the background but felt bad because he was with his family. And I apologised about the situation and said sorry. But sir on the other hand was consoling me by saying that may be he misheard me. This simplicity sometimes brings huge problems to them.
We both share a comman factor of taking responsibilities and working that’s why people say “ These two ghosts of FC are always at college!”.
 May be that’s the reason that from las 21 years we never had any misunderstanding or a quarrel.
Working in same collge and teaching the same subject and still having an good communication and understanding is rare.
 I am very lucky to have a colleague like Yadav Sir.

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला   डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी दिनांक - ३० डिसेंबर २०२३ ___________________...